निरोप
निरोप
निरोप सुख दुःख आणि ओढीचा
कधी परतीची आशा
कुठे कायमच्या निराशेचा
निरोप कधी अविस्मरणीय आठवणींचा
कधी सासरी जाणाऱ्या लेकीचा,
कधी शालेय विद्यार्थ्यांचा
कधी सेवानिवृत्त व्यक्तींचा
निरोप कधी कळत नकळत
भेटणाऱ्या माणसांचा
कधी जीवघेण्या विरहाचा
कधी भाव भरल्या डोळ्यांचा
कधी जिवलग आप्तजनांचा
निरोप उलटून गेलेल्या रात्रीचा
आयुष्याचा प्रवास करतांना
सरलेल्या वर्षाचा
निरोप कधी भावना अनावर होणाऱ्या
मनाचा कंठ दाटून,
डोळे पाणावलेल्या
अबोल शब्दांचा
निरोप जणू हळव्या तो फुलांचा
आठवणी हृदयाशी साठवून
जगलेल्या गोड क्षणाचा
निरोप द्यायचा कोणी...
निरोप घ्यायचा कोणी ....
आपण सारे निरोपाचे धनी..म्हणून
आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्वाचा
माणुसकीची जाणीव असावी
माणूस म्हणून जगतांना
उरले असे काही नसावे
मागे वळून बघतांना
समाधान वाटावे या जन्माचे
सतत प्रयत्नशील राहावे
किती संकटे असतांना
विचारांची श्रीमंती जपावी
सुख सारी उपभोगतांना, कीर्तिरूपे उरावे,
करावे जन्माचे सार्थक
निरोप शेवटचा घेताना ..