अंंगद शिष्टाई - भाग ३
अंंगद शिष्टाई - भाग ३
असे सांगितल्यावर हनुमान म्हणाले, हे श्रीराम ! वानरांची संख्या वीस पद्म इतकी आहे. ते शक्तिनी परिपूर्ण आहेत. त्यामध्ये वालीचा मुलगा अंगद हा बलवान आहे. तो रावणाच्या सभेत बोलण्यास समर्थ आहे. तो धैर्यवान आहे. तो रावणाच्या सभेत जाण्यास सुयोग्य आहे. त्यालाच दूत म्हणून पाठवावे.
अंगद आल्यावर श्रीरामांनी त्याला हृदयाशी धरले व म्हणाले तूं राजदुत म्हणून रावणाकडे जा.
रावणाला काय सांगायचे ते ऐक. या युद्धाचे कारण तू केलेली चोरी आहे. तू माझ्या पत्नीला पळवून नेले आहेस . मी ( धनुर्धारी राम ) निर्धार केला आहे की तुला याचा दंड (शिक्षा) मिळेल. परदारा (दुसऱ्याची पत्नी ) हरण हे तुझ्या मरणाचे कारण होणार. माझे अमोघ बाण सुटल्यावर त्यांना कोणी थांबवु शकत नाही. त्यामुळे तू अयोध्येच्या राजाला शरण जाऊन सीतेला परत द्यावेस. तुझ्या लंकेचे, राज्याचे हित बघ. असे सांगून अंगदाला फळे वगैरे देऊन लंकेला जाण्यास सांगितले. अंगद म्हणाला ' हे रघुनाथा ! हे समर्था , तुमची आज्ञा प्रमाण आहे. आपणच आपला पराक्रम सांगणे हे मुर्खतेचे लक्षण आहे. त्यामुळे मी आपणास नमस्कार करतो व लंकेस जातो.
अंगद रामबाणाप्रमाणे उडाला व वेगाने मार्गक्रमण करत लंकेत पोहोचला. रावणाच्या सभेत त्याची उडी पडली तेव्हा रावण दचकला. धरती कांपू लागली. सर्व जण भयभीत झाले. हा अवघ्यांचा घात करावयास आला आहे असा सर्वत्र पुकारा झाला. राक्षसांमधे हाहाकार माजला. अंगदाला समोर पाहताच रावण स्तब्ध झाला. सर्व राक्षस टकमक बघत होते पण कोणीच काही बोलत नव्हते. अंगद म्हणाला, मी आपला अतिथी आहे, तरी आपण माझे स्वागत करीत नाही. भयभीत झाला आहात. अरे राक्षसांनो, हनुमंताने अशोकवनाचा व राक्षसांचा नाश केला त्यामुळे तुमची दातखिळी बसली आहे. तुम्हाला बोलण्यास शब्द सापडत नाहीत.