बालपण
बालपण
मी,अंतर्मनात डोकावतांना
नजरेस पडे माझे बालपण
मित्र मैत्रिणी अन ती शाळा
सतत त्यात रेंगाळणार मन
बालपण म्हटलं तर आठवतात आपले मित्र,मैत्रिणी बालपणीच गाव,जुणं घर, घराच्या अवतीभोवतीचा परिसर, शेजारी, बालपणी बाबासोबत, बाबाच बोट पकडून वर्गात टाकलेलं पहिलं पाऊल, शाळेचा पहिला दिवस,कधीतरी काही कारणासाठी झालेलं मित्रानंसोबतच ते भांडण, मग रागाच्या भरात मित्रांसोबत घेतलेली कट्टी,तोंडातून निघालेले अपशब्द, अन कधी पहिला डेक्सबेंच मिळविण्यासाठी झालेली स्पर्धा, थंडीच्या दिवसातील शनिवारी सकाळच्या शाळेची नं चुकता होणारी पिटी, अन जर प्रार्थनेला उशिरा पोहचल्यास हातावर मिळणारी छडी,..
अशा कितीतरी आठवणी, "डोळे मिटून पाहताच" विचारांनीच डोळ्यासमोर चित्र तयार होते, मनाला वेड लावते अन घेऊन जाते त्या बालपणात,...
मग स्वतःलाच विचार येतो कि बालपण किती छान होत,
मनाला वाटते कि पुन्हा परतून जावं आपण आपल्या बालपणात,अन कधीच आपण मोठं नाही व्हावं,अगदी लहान बाळ बनून आईच्या आवतीभोवती खेळत रहावं,कधी तिच्या कुशीत कधी बाबांच्या खांद्यावर, "मस्त आनंदाने खेळावं, मनसोक्त जगावं"...
"बालपण" किती छान शब्द आहे ना
या मतलबी दुनिये पेक्षा
नं कशाची काळजी नं चिंता
नं कसली खंत नं कसली अपेक्षा..!