बदल..
बदल..
बदलासाठी आसुसलेले असतो आपण सगळेच..
सतत काहीतरी नवीन हवं असतं नं आपल्याला..
नवीन निसर्ग, नवीन माणसं, नवीन गाव..
एका जागी स्थिर बसण्यात interest नसतो आपल्याला बऱ्याचदा..
पण कधी कधी सतत काहीतरी नवीन समोर येणार, याचीही सवय होते...
आली का पंचाईत !
मग? अशावेळी कुठे धावायचं? धावण्याचाच कंटाळा आल्यावर करायचं तरी काय नक्की ?
अशा वेळी आत पहावं.. स्वतःच्याच आत..!
डोळे मिटून शांतपणे ऐकावं "स्वतः"ला.. ती श्वासाची लय, तो उच्श्वासाचा सूर, मिटलेल्या पापण्यांच्या आड निजलेली आकाशाएवढी स्वप्नं !
कधीतरी भेट द्यावी त्यांनासुद्धा !
दोन मिनिटं असं शांत बसलं ना, तरी खूप fresh वाटतं.
काहीच न करता, खूप काही मिळाल्यासारखं वाटतं..
आजवर बाहेर धावलो, कधीतरी स्वतःच्याच आतली वाट चोखाळून पाहू..
नंतर असं लक्षात येतं, की ही वाट "धावण्यासाठी" नाहीचे ! ही तर शांत होण्याची वाट आहे !
शेवटी, हेच तर हवं असतं नं माणसाला ! शांती, समाधान, आनंद !
याच साठी बाहेरच्या वाटांवर धावत होतो आपण ! बाहेरच्या वाटा धुंडाळताना स्वतःला शोधायचंच राहून गेलं वाटतं..
हे सगळं होत असताना, हळूच बाहेरून कोणीतरी उघडतं बाहेर जाण्याचं दार... किलकिलं.. एक प्रकाशाची तिरीप येते आत.. ती जास्त तेजस्वी वाटायला लागते, आतल्या शांतीपेक्षा..
जावं का बाहेर ?
मनात विचारांचं काहूर...
आतच असूनही आपण कधीच बाहेर पोहोचलेलो असतो...
पुन्हा कधीतरी आत येण्यासाठी...