खरी निर्णयक्षमता
खरी निर्णयक्षमता
जेव्हा आपण घेतलेल्या निर्णयाचा आपणच पुन्हा पुन्हा विचार करत असतो, खरंतर आपण, काय वाईट परिणाम असू शकतात याचा जास्त विचार करत असतो, तेव्हा या प्रक्रियेत आपण आपल्या निर्णयाची आणि परिणामांची देखील जबाबदारी घेण्यासाठी स्वतःला तयार करत असतो. याउलट, आपण घेतलेल्या निर्णयाबद्दल प्रश्न निर्माण करून, त्याची जबरदस्तीच्या चांगुलपणातून उत्तरं शोधून, आपण आपल्या चुकांचे किंवा अपयशाचे खापर कुठे आणि कोणा कोणावर फोडायचे, याची चोख व्यवस्था करत असतो. आपला अहंकार आपल्या नकळत आपल्यासह हा खेळ रचत असतो. मग प्रश्न आहेच ना, की आपणास हे कळणार कसं? त्यासाठी कायम स्वतःला आरश्यात बघणं आवश्यक आहे, स्वतःशी बोलत राहणं आवश्यक आहे. इतरांशी चर्चा करण्यात आनंद वाटणारी लोकं जर त्यांची इतरांशी बोलण्याची पद्धत निक्षुन पाहू शकत असले, आपल्या वागण्यात होणाऱ्या बदलांचे व्यवस्थित निरीक्षण करू शकले तर एक गोष्ट ध्यानात येईल की आपण तेच बोलतो जे आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यात करत असतो. कधी ते वस्तूनिष्ठ रूपात असेल किंवा वैचारिक.
पण मग यात वाईट काय आहे? तसं वाईट नाही, समोरच्यासाठी अजिबात नाही पण स्वतःसाठी कदाचित हो. जर निरखून स्वतःला ऐकलंत तर चर्चेमध्ये आपण जर समोरच्याला ऐकून घेऊ शकत नसू किंवा असंबंधित जागी अशी वाक्य मांडत असू जी तत्वशील असतील मात्र त्यांचा पुरेसा अर्थ आपणांस ठाऊक नाही आणि तो उलगडण्याचा प्रयत्न टाळला आहे. हा संकेत लक्षात घेऊन आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्या हेतुंची, विश्वासाची; त्याहून महत्वाचे म्हणजे निष्ठेची तपासणी करणं आवश्यक आहे. आपल्या वस्तूंची डागडुजी करण्याबरोबर वैचारिकतेची देखील डागडुजी करण्यासाठी वेळेची आणि आपल्या बुद्धी अन मनाची खतरजमा केलेली केव्हाही योग्यच, होय ना!