पुणे ते ओतूर प्रवास
पुणे ते ओतूर प्रवास
।।पुणे ते ओतूर प्रवास।।
आज तशी घाईच झाली होती. रात्रीच खोलीवर बॅग भरून ठेवली होती म्हणून बरं झालं. सकाळीच लवकर उठून चिमण्या-पाखर अंघोळ करतात तशीच सार्वजनिक नळाखाली अंघोळ उरकून घेतली. जरासा मुखडा आरशात पाहून घेतला आणि डोक्यावरचं कुरुळी केसांचं जंगलसारख करीत खोलीचं कुलूप नजरेने शोधू लागलो तर, माझा खोलीतला माझा मित्र हातात कुलूप, चावी घेऊन आधीच तयार होता.
आम्ही खोलीला कुलूप घातलं आणि चावी खोली मालकाला दिली. व्यवहार आधीच पूर्ण झाला होता म्हणून त्यांचा निरोप घेऊन निघालो आणि बस येण्याचं वाट न पाहताच सकाळी सकाळी दोन पायाच्या गाडीन झपाझप पावलं टाकीत कॉलेज गाठलं.
झाडावर पक्षाची किलबिल चालते तसेच इथलं वातावरण होतं. कोण काय बोलत होत, हे त्याचं त्यांनाच माहिती. आम्ही दोघेही सरळ आमच्या वर्गात गेलो. सर, निकाल पत्रकाचे वाटप करी होते. आमचा नंबर आल्यावर आम्ही आमच निकाल पत्रक आणि बाकी कागदपत्र घेऊन सरळ गावचा रस्ता धरला.
शिवाजीनगर एस टीस्टँडवर आलो. आता मित्र त्याच्या घरी आणि मी माझ्या घरी...त्यामुळे मी एकटाच होतो. फ्लॅट नंबर एकवर नाशिकला जाणारी गाडी उभीच होती.मी पटकन गाडीत चढलो आणि जिथं जागा मोकळी होती तिथंच वर कॅबिनमध्ये बॅग ठेवून, खालच्या मोकळ्या सीटवर बसलो.
काही वेळात तिकीट मास्तर आले. थोड्या वेळात तिकीट काढून झाली आणि त्यांना बेल मारून ड्रायव्हरला गाडी सोडण्याचा इशारा दिला. गाडी सुरू झाली. गाडीत लोकांचा किलबिलाट गोंगाट सुरूच होता.. काय बोलतात एवढं रोज कोण जाणे, पण सारखं याची-त्याची धुनी-धुन धुत असतात.. काही लोक तर कायम सुनेचा नाही तर सासुच, नाहीतर नवरा-बायकोचा झगडा इथं गाडीत सुध्दा सुरू असतो. तो त्यांचा जणू जन्म सिद्ध अधिकारच आहे. पण हे गाडीत बसल्यावरच का बोलतात..बरं शेजारचा माणूस ओळखीचा असो नाही तर नसो. त्यालाही ते बोलत करतात....
सकाळची वेळ होती. म्हणून रस्ताही थोडा मोकळाच होता. वाऱ्याशी स्पर्धा करीत गाडी धावत होती आणि मी मात्र घरी जाऊन सर्वाना पास झालो हे कधी सांगतोय असं झालं होतं. मी माझ्याच विचारात किती काळ....हे जेंव्हा एक दीड तासाने राजगुरूनगर आलं तेंव्हा कळलं तेही कधी तर...
तिकीट मास्तरने आवाज दिला!! तेंव्हा...
' कोणीही गाडीच्या खाली उतरू नका, गाडी लगेच सुटणार आहे'
. हे ऐकून मी भानावर आलो. मी सकाळ पासून एक नंबरला गेलो नव्हतो आणि आता मला जोरात कळ आली होती. काय करू ... या विचारात तिकीट मास्तर खाली उतरून गेला... मी ही उतरलो. गाडी सुरु झाल्यापासून मी कोणाशीच बोललो नाही. आता शेजारी सांगावं काय? मी काहीच न बोलता पटकन खाली उतरलो...
पुन्हा गाडी जिथं उभी होती तिथं आलो तर, गाडी तिथं नव्हती. पटकन एसटीच्या कॅबिनमध्ये गेलो. घाई घाईत माझं म्हणणं मॅनेजरला सांगितलं पण ते म्हणाले ...
'मास्तरला सांगून जायचं ना आणि एक तर, ती गाडी इथं जास्त वेळ थांबत नाही'
'आता मला दुसरी गाडी' ... मॅनेजर म्हणाले तुम्हाला जायचं कुठं? मी म्हटलं..
'ओतूर'
'ओतूर आहो मग नाशिक गाडीत का बसलात पाठीमाग ओतूरला जाणारी गाडी होती ना?....
'आता असं करा मागे रस्त्यावर जा!! आणि मिळेल ती गाडी पकडा आणि बघा पुढे आपली गाडी मंचर, नारायणगाव इथे थांबेल.... काय हो सोबत काही समान बीमान होत का? मॅनेजरचा प्रश्न?'
मी हो म्हणालो..मी, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता मुख्य रस्त्यावर आलो. पण मॅनेजर म्हणत होते ते थोडं थोडं कानावर पडत ते आठवलं. कोणी घेतलं नाही तर, नाशिक डेपोत समान जमा होईल....त्याचा मला काय उपयोग म्हणा....मी मनातच पुपुटलो..
काय योगायोग एक मालवाहू ट्रक नाशिकच्या दिशेने जात होता मी, त्याला हात केला आणि काही अंतर पुढं गेल्यावर ट्रक ड्रायव्हरने ट्रक उभा केला. त्यानं मला त्याच्या पुढल्या क्याबीनमध्ये घेतलं.... मला या गडबडीत धावपळीत खूप धाप लावली होती. घशाला कोरड पडली पण यांच्याजवळ पाणी कसं मागणार...
तेवढया गाडीचा ड्रायव्हर सरदारजी म्हणाला..
'क्यो!! भाई इतनी गडबड क्यो? आप तो पसीना पसीना हो गए। कुछ घाबरये हुये लागते हो क्या?...बात क्या है जरा बोलो गे तो' ....
'आ रे ए मुन्ना जरा पानी पिला इस बंदे को... बेचार घाबरा गया है।'
माझं दुखणं सरदारजीच्या लक्ष्यात आलं होतं. मुन्ना ने दिलेलं पानी दोन घोट घेतलं आणि माझी कैफियत सांगू लागलो. मला त्या गडबडीत हिंदी नीट बोलता येईना....
तरी मोडक तोडक त्याला समजेत असं बोलण्याचा प्रयत्न केला..
'मेरी गाडी आगे चली गई, और उस मे मेरा सामान है।' उस गाडी को, मुझे पकडना है। आप जरा जोरसे चलेंगे, तो मेरी गाडी मिल सकती है। आप चाहे तो जादा पैसे ले सकते हो।
मी, एवढं बोले पर्यंत गाडीने वेग घेतला होता..आणि सरदारजी गाडी चालविण्याचा नादात बोलत होता.
'बेटा तू चिंता मत कर। घाबराओ मत आप की गाडी मिल जायेगी।'...
माझं मन थाऱ्यावर कुठं होतं. तो काय म्हणतो यापेक्षा मला माझी एस टी ची गाडी कधी दिसेल याकडे लक्ष होतं... मनात अनेक गोष्टी फेर धरून नाचत होत्या...
घरची गरिबी होती म्हणून घरातली मंडळी म्हणत होती, पुढे शिकू नको म्हणून त्यांचं ऐकनल नाही. लोकांनी मित्रांनी मदत केली म्हणून शिक्षण झालं. खरं पण ...आता माझं शिक्षणाची कागदपत्र प्रवासात हरवली होती. मला काहीच सुचत नव्हतं... अशा विचारत असताना..सरदारजीने करकचून ब्रेक दाबला आणि गाडी थांबली. पण समोरच्या गेटमधून पुणे नाशिक एस टी पुढे निघून गेली होती.....
सरदारजीच्या चेहऱ्यावर थोडं हसू जाणवलं होत.. तो म्हणत होता..
बच्चू अभी तो मै तुझे छोडुंगा नही। कितना भागेगा तू । आणि तसच झालं.
मला ही प्रवासात फक्त पुढे एस टी आणि मागून हा आमचा ट्रक.... जणू स्पर्धाच सुरू होती... मधून मधून सरदारजी हॉर्न वाजवून इशारा देत होता पण... पुढील बाजूच्या गाड्यांच्या येण्यामुळे तो आम्हाला साईट देत नव्हता. मला तर, अस वाटत होत. जस काही मीच पायाने जोर लावून ट्रक ढकलो आहे...
आता एकदाच नारायणगाव आलं आणि सरदारजीने एस टी डेपोत गेल्यावर पुन्हा एस टी जिथून बाहेर पडते तिथे ट्रक उभा केला. मी पैसे आधीच तयार ठेवले होते. पण, त्याने ते घेतले नाहीत. म्हणाला
'बेटा पहिले तू एस टी वाले को पकड। मै बाजू में गाडी खडी करता हुं।'
मी पटकन गाडीतून उडी मारली आणि नाशिक गाडी शोधून त्या एस टी त चढलो. माझी बॅग जाग्यावर हाती पण माझ्या सीटवर दुसरा माणूस बसला होता. मला पाहून माझ्या शेजारी बसलेला माणूस मला पाहून दचकलाच....अनु म्हणाला..
'आ रे तू होता कुठे? मला वाटलं तुझं गाव आलं म्हणून उतरून गेला की काय?'
'कडक्टरने दोन वेळा गाडी चेक केली एक माणूस कमी आहे म्हणाला... बरं झालं त्या तिकीट मास्टरला पहिला भेट बरं'....
तेवढ्या तिकीट मास्तर आले. बेल देता देता म्हणाले
'नवीन कोणी?' मी उभाच होतो. मला पाहून तो म्हणाला....
'तू कुठं गेला होतास? माझी नोकरी घालवायची आहे का? कोणी उतरू नका म्हणालो होतो ना?"
मी बोलण्याच्या अगोदरच माझ्यावरच शब्दांचा गोळीबार झाला..... मी काय बोलणार होतो. मी, माझी बॅग घेऊन गाडीतून उतरू लागलो तर म्हणे! 'आता कुठे' तिकीट मास्तर...
'मी इथेच उतरतो' मी म्हणालो...
'का? तिकीट मास्तर
'या गाडीच्या मग ओतूर गाडी आहे म्हणतात'..
'आ रे पण तुला पुढे उतरायचं होत ना'? तिकीट मास्तर..
मी म्हटलं
'आता पुढे उरण्याच्या नादात माझी गाडी पुढे निघून गेली मग?...
'ठीक आहे उतर सावकाश' ....तिकीट मास्तर
मी, खाली उतरून पहिलं सरदारजीला जाऊन भेटलो. मी पुन्हा त्याच्याकडे भेटायला आलो म्हणून, खूप आनंद झाला. मी त्यांना धन्यवाद म्हटलं आणि पुन्हा नारायणगाव एस टी स्टँडवर आलो...आणि ओतूर गाडी येईपर्यंत मनातल्या मनात त्या अज्ञात परमेश्वराचे आभार मानले...
तेंव्हा एक गोष्ट माझ्या लक्ष्यात आली. प्रामाणिकपणा आणि जिद्द सोडायची नाही... कोणी काहीही म्हणो देव आहे की, नाही मला माहित नाही. पण आज मला ...या पुणे ते ओतूर प्रवासात भेटून मदत करणारा सरदारजी कोण होता...?? तो भेटला नसता तर, माझ्या पुढील भवितव्याचं काय झालं असतं... अनेक प्रश्न..... पण उत्तर मनाचा उत्तर आलं तो आहे....दिसत नसला तरी .... त्याच अस्तित्व या प्रवासात मला जाणवलं होत.....हेच खरं...