श्रावण
श्रावण
"श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सर सर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे”
श्रावण महिना म्हटला कि बालकवींची ही कविता आपसूकच आठवते. किती सुंदर निसर्गाचे वर्णन बालकवींनी या कवितेत केले आहे आणि खरोखरच श्रावण महिन्यात आपल्याला निसर्गाचे सुंदर रूप बघायला मिळते. श्रावणात पृथ्वी जणू समारंभासाठी सज्ज होऊन नटून थाटून हिरवा शालू पांघरून तयार आहे असे भासते. पावसाच्या सारी ये जा करतात मध्येच कोवळे ऊन पडते.उंच उंच पर्वत रांगांमधून धबधब्याचे पाणी पडतांना दिसते. नद्या तुडुंब भरून वाहतात. हा समारंभ बघण्यासाठी म्हणून कि काय देव पृथ्वीवर हजेरी लावत असतील कारण श्रावणात पृथ्वीचे स्वर्गाहून सुंदर लोभसवाणे रूप दिसते. म्हणूनच तर महाराष्ट्रात खूप सण हे श्रावणातच येतात.श्रावण महिन्यातील पाऊस रखरखत्या उन्हाळ्यातील त्रासानंतर सर्व जीवांना शांती देतो व पाण्यासाठी हालअपेष्ठा नष्ट होऊन पावसामुळे सर्वांच्या मनाला दिलासा मिळतो.
श्रावणातील सणांची मेजवानी सुरु होते . श्रावणी सोमवार या दिवशी महादेवाची पूजा करून उपवास केल्या जातो. महादेवाला बेल,फुल वाहून पुजल्या जाते.महादेवाच्या मंदिरात लोकांच्या रांगा दिसतात. सर्व चिंता विसरून लोक एकाग्रचित्ताने शंकराचे नामस्मरण करून तासनतास रांगेत उभे राहतात. त्यामुळे मनुष्याचे मनोबल वाढते व उतावीळपण नष्ट होऊन वाट पाहण्याची सवय लागते.ब्रेल फुल महादेवाला अर्पण केले जाते जी निसर्गाने पाने,फुले दिली ती देवाला अर्पण करून देवाचे आभार मानल्या जातात व आयुष्यातील संकटावर मात करून धीराने पुढे जाण्याची शक्ती आपल्याला येते. उपवासामुळे सहनशक्ती वाढते व तसेच उपवासाच्या निरनिराळ्या पदार्थाचा आस्वादही चाखता येतो.
नागपंचमीची पूजा नागपंचमीला याच महिन्यात केली जाते. कुणी वारुळाची पूजा करतो तर कुणी घरी कागदावर किंवा पाटीवर नागाची प्रतिमा काढून पुजतो. शिरा पुरीचा नैवेद्य नागाला अर्पण केल्या जातो व लाह्या फुटण्याचा प्रसाद व दूध नागाला अर्पण केल्या जाते. नाग हे विष्णूचे वाहन आहे असे मानले जाते. व शंकरालाही नाग आवडतो. म्हणून नागाचे महत्त्व ह्या महिन्यात समजते. निसर्गातील समतोल राखण्यासाठी प्रत्येक प्राणी हा महत्त्वाचाच आहे त्यामुळे त्याचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. असा निष्कर्ष निघतो.
नवीन लग्न झालेल्या मुली मंगळागौर पूजतात आजही धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून मैत्रिणीसोबत निरनिराळे खेळ खेळतात. या निमित्ताने मैत्रिणी,नातेवाईक एकत्र जमतात.
बहीण भावाच्या नात्याची आठवण करून देणारा महत्त्वाचा सण रक्षाबंधनहि याच महिन्यात येतो. बहीण भावाला अक्षदा कुंकू लावते. व काहीतरी गोडधोड देते.बहीण भावाला राखी बांधून आजन्म रक्षणाचे वचन घेते तर भाऊ बहिणीला वचन देऊन उपहार देतो.
सर्वांचा लाडका गोपाळकृष्णाचा जन्मदिवस गोकुळ अष्ठमीला श्रावणातच येतो. गोकुळाष्टमीला रात्री जागून पाळणा म्हटल्या जातो ,सुंठवडा केल्या जातो. दुसऱ्या दिवशी गोपाळकाला केल्या जातो. दहिहांडी फोडल्या जाते.या दहीहंडीच्या निमित्ताने लोकांमधील एकजूट दिसते. या एकजुटीतून काम करून कशी उंच दहिहांडी फोडल्या जाते हे बघायला मिळते दहीहंडीत जितका वर चढून दहिहांडी फोडणारा महत्त्वाचा असतो तेवढाच या सर्वांना पेलणारे खालचे व्यक्तीही महत्त्वाचे असतात. किंबहुना वरच्या पेक्षाही जास्त असतात. कारण पायाच डगमगला तर पूर्ण थर पडू शकतो.
नंतर सर्वात शेवटी येतो तो बैल पोळा या दिवशी वर्षभर काम करणाऱ्या बैलाला आराम देऊन त्याची पूजा केली जातो. बैलाला सजवल्या जाते . या दिवशी ज्वारी पासून बनवून ठोंबरा केल्या जातो.
असा हा सुंदर श्रावण ज्या महिन्यातील सण म्हणजे निसर्ग,प्राणी,नाती या सर्वांची आठवण करून देतो. सणाच्या निमित्ताने जिभेचेही विविध चोचले पुरविल्या जातात.
उपवासाच्या निरनिराळ्या पदार्थांचा आनंद श्रावणी सोमवारी उपभोगल्या जातो.
निसर्गाचे सौंदर्य,सणाची रेलचेल जिभेचे चोचले पुरविणारा हा सर्वांचा आवडता महिना श्रावण आणि निसर्गाचे रूप बघण्यासाठी व आस्वाद लुटण्यासाठी, तर कधी दर्शनाच्या निमित्ताने लोक निरनिराळ्या ठिकाणच्या सहली काढतात व निसर्गाचा मनमुराद आनंद लुटतात.
असा हा विविधरंगी श्रावण महिना श्रावणसरी,निसर्गसौंदर्य,सण, सहली,कर्तव्यनिष्ठता या सर्वांचा मिलाप आहे आणि आणि अशा या श्रावण महिन्याला समर्पित मी एक काव्य रचले त्यात श्रावणी सणाचे वर्णन केले.
श्रावण
“सणासुदीची घेऊन उधळण
आला हा हसरा श्रावण
चला पुजू या नागपंचमी
सर्प संगती शत्रू नाही मित्र आम्ही
महान सण हा रक्षाबंधन
दृढ होती बहीण भावाचे पवित्र बंधन
सोमवारी पुजू या महादेव
नतमस्तक होऊन म्हणू सुखी ठेव
सौभाग्यवती पुजती मंगळागौर
खेळ खेळुनि पारंपरिक थोर
जन्माष्ठमीचा सण महान
दहीहंडीला येति उधान
असा हा हसरा गोजिरा श्रावण
कर्तव्य आणि नात्याची देतो आठवण
परंपरेचे करू या सर्व मिळून जतन
अमोल ठेवा संस्कृतीचा राखू या आपण “