योगायोग
योगायोग
ते दिवस होते ऑगस्ट १९८९-९० चे.शाळा काॅलेजेसमधून मुलाखतीचे. त्यासाठी मीही सज्ज झाले होते. खुप ठिकाणी मुलाखतीला जाऊन आले होते पण कुठे ही नोकरी मिळत नव्हती.आड येत होते ते अनुदान. प्रत्येक ठिकाणी सहजपणे चालावे असे हे व्यवहार होत असत. मोठमोठ्या रकमेची मागणी करण्यात येत असे. पण माझ्या सारख्या ऐपत नसणाऱ्या उमेदवारांचे काय? त्यातच माझा स्वाभिमानी स्वभाव आड यायचा.माझ्याकडे गुणवत्ता असतांनाही मी कां संस्थेला लठ्ठ अनुदान देऊन नोकरी करावी हा प्रश्न मला सतत भेडसावत असे. केवळ अनुदान देऊन या संस्थांचे भागत नसे. काही महिने किंवा वर्ष बिना वेतन काम केल्यानंतर कुठे तो उमेदवार कायमस्वरूपी व्हायचा.
अशाप्रकारे हा शिक्षण घेऊन शिक्षणाचा अपव्यय होत आहे असे वाटायचे. मन नकारात्मक विचारांनी भरून जायचे. शिक्षणाचे बाजारीकरण होतांना स्पष्ट दिसत होते. शिवाय खाजगीकरणामूळे या प्रवृत्तीला चालना मिळाली होती. आईवडिलांनी असलेली पुंजी मुले बेकार राहण्यापेक्षा व रोजमजुरीची वेळ त्यांच्यावर येऊ नये या भावनेने नोकरी मिळवण्यासाठी या संस्थानिकांच्या स्वाधीन करायचे असेच वातावरण त्यावेळी होते.आजही अनेक ठिकाणी आहे.
अशातच त्या वेळेस काही जाहिराती वर्तमानपत्रात जाहीर झाल्या. मी त्या त्या महाविद्यालयाला माझे अर्ज पाठविले. त्या सगळ्या महाविद्यालयांनी मला मुलाखतीला बोलावले होते. त्यापैकी एक म्हणजे पुसद, जिल्हा यवतमाळ येथील पत्र होते.
मी तेव्हा नागपूर येथे माझ्या मोठ्या भावाकडे रहायचे. भाऊ मला प्रत्येक कामात मदत करायचा आणि प्रोत्साहन देत असे. त्या प्रेरणेमुळे मी एकही मुलाखत सोडत नसे. पुसदच्या महाविद्यालयात मुलाखतीसाठी जायचे ठरले. त्याप्रमाणे सकाळी तयारी करून भाऊ मला पुसदला जाणाऱ्या बसमध्ये सोडून आला.
नागपूर ते पुसद साडेचार तास लागणार होते. सकाळी साडेसहा ची बस घेतली होती. साडे अकरा बारा च्या दरम्यान मी पोचेल असा अनुमान होता. नियतीच्या मनात काही वेगळेच होते. जाताना खूप पाऊस आला. मनात धाकधूक होतीच. पावसाच्या तांडवामुळे मी साडेतीनला पोचले.
पोचल्यावर माझ्यासारखे अनेक उमेदवार तिथे उपस्थित होते.काहींच्या मुलाखती झाल्या होत्या तर काहींच्या बाकी होत्या. माझा नंबर शेवटून लागला. तोपर्यंत पाच वाजले होते. पाऊस पडतच होता. कसेबसे मुलाखती देऊन सारे मुलं मुली बसस्थानकाकडे धावले. तशीच मीही लगबगीने जायला लागले. बस लागलेलीच होती. मुलाखतीला आलेले काही मुले ही त्या बसमध्ये होते.
साधारण साडेपाच सहाला बस सुरू झाली. हुश्श वाटले. साडेदहा अकरा वाजता रात्री नागपूरला घरी पोचणार या समाधानात मी शांत बसले होते. पावसाची रिपरिप सुरूच होती. एक तास गेल्यावर बस एका ठिकाणी जी थांबली ती पुढे जाईच ना. दोन तास झाले तीन तास झाले बस हलेना.
काही वेळाने कळले की अतिशय पावसाने रस्त्यात पडणाऱ्या वर्धा नदीला मोठा पूर आला आहे व पुढे जाणे धोक्याचे आहे. रात्रीचे अकरा वाजून गेले तरी आम्ही तिथेच. तेव्हा मोबाईल फोनची सोय नव्हती. घरी फोन करून कळवता येणे शक्यच नव्हते. मनातुन मी आणि आम्ही सारेच घाबरलेल्या अवस्थेत होतो.
बऱ्याच वेळाने बस सुरू झाली. कसेबसे यवतमाळ आले होते. पण वाजले होते किती... रात्रीचा दीड! अचानक वाहकाने सुचेना दिली की धुवांधार कोसळणाऱ्या पावसामुळे परिसरात सगळीकडे पाणीच पाणी झाले आहे, बस पुढे जाणार नाही, सर्वांनी बसमधून खाली उतरावे व आपली व्यवस्था करावी.
आता तर मी फारच अस्वस्थ झाले. सगळेजण मुलगे होते ते भरभर उतरून आपल्या मार्गाला लागले. मी एकटीच मुलगी होते, कुठे जाणार या अशा पावसाळी रात्री ! जीव मुठीत धरून मी बसमधून उतरले. भितीने मन विषण्ण होते. भिती रात्र झाली याची नव्हती. भिती पावसाची वाटत नव्हती. भिती वाटली होती पुरूषरूपी भेडियांची. बसस्थानकावर रात्रीच्या वेळी असे एकटीला बघून आपल्यावर अपप्रसंग ओढवू शकतो याची. पहिल्यांदा खूप असहाय समजले मी स्वतःला. हृदय जलद गतीने धावू लागले होते. मनाला मोठ्या प्रयत्नाने सावरले व एक एक पाऊल पुढे टाकत बसस्थानकावर असलेल्या बाकाकडे जाऊ लागले.
पुढे जाताच मला आश्चर्याचा धक्काच बसला. अन् मी काय बघते हेच मला कळेना. स्वप्न होते की सत्यता समजेना. मी त्या बाकावर बसून पेंगत असलेल्या व्यक्तीकडे मोठ्या हिंमतीने गेले. त्या व्यक्तीने हळूच मान वर केली आणि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. होय माझा मामा होता तो ! हसावे की रडावे कळत नव्हते. अगदी एखाद्या सिनेमात घडावे तसाच अनुभव होता. एकाच क्षणी भिती आणि आनंद यांचे मिश्रण झाले होते.
मला बघताच मामालाही आश्चर्याचा धक्का बसला. एवढ्या रात्री मी इथे कशी असे विचारू लागला. सर्व घटना कथन केली. मामाच्या गावाकडे जाणारी बस सुद्धा संततधार पावसामुळे बंद होती . त्यामुळे मामा गावाला न जा बसस्थानकावरच थांबलेले होते. हा सगळा योगायोग घडल्यावरही माझा प्रवास संपला नव्हता.
मामा उठला आणि, " चल माझ्या बरोबर " म्हणाला. मी मुकाट्याने मामाच्या मागे मागे निघाले. खरोखरच सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. रस्ताही दिवस नव्हता. अशा परिस्थितीत आम्ही एका नातलगाच्या घरी कसेतरी पोचलो. मामा भेटल्यामुळे आलेला धीर आता निवासाचे छत्र मिळाल्याने द्विगुणित झाला होता.
एकापाठोपाठ दोन रात्री गेल्या. नागपूरकडे जाणाऱ्या बसेस सुरू झाल्या नव्हत्या. नवी चिंता वाढायला लागली.तिकडे भाऊ बहिण घरी का आली नाही या विचाराने चिंताग्रस्त होता. सूखरुप असल्याचा निरोप पाठवायची सोय नव्हती.
तिसऱ्या दिवशी यवतमाळ ते नागपूर बसेस सुरू झाल्या.मामानी मला बसस्थानकावर सोडून दिले. अशा प्रकारे सुखरूप भाऊकडे पोचले. मी पोचल्याचे पाहून भाऊही आनंदीत झाला.
प्रवास वर्णन