आनंदाचे कण
आनंदाचे कण
अरे काय चाललंय काय?
अरे काय चाललंय काय?
कुठे गेले ते पूर्वीचे दिवस?
मैत्रिणींना मनसोक्त भेटायचे..
खिडकीत बसून चहाबरोबर
गप्पांचे फड रंगवायचे..
बिनधास्त टाळ्या देत
खिदळत बसायचे..
संध्याकाळी निवांत
गल्लीत भटकायचे..
भेटलीच कोणी शेजारीण
तर अंतर न राखता बोलण्याचे..
मोकळी हवा खाऊन
परवचा म्हणायला घरी परतायचे..
आणि आता..
मैत्रिणींशी व्हाट्सअपवर बोलायचे..
व्हिडीओ कॉल करायचे..
स्क्रीन शॉट घेऊन
ते स्टेट्सला लटकवायचे..
अन् भेटीचे समाधान
यातच मानायचे..
संध्याकाळी निमूट
घरात बसायचे..
कधीतरी रमीचे डाव टाकायचे..
लेकीबरोबर बालवीर बघायचे..
अरे काय चाललंय काय?
पण एक सांगू....
मैत्रिणी न भेटणं ही
वाटत असेल जरी सजा,
तरी दुरीनंतर होणाऱ्या भेटीत
असेल एक अनोखी मजा
आणि ती रमी....
शाळेतल्या सुट्टीतल्या दिवसांची
जाणवू देत नाही हो कमी
लेकीबरोबर लेकीएवढं होऊन
बघितलेला बालवीर...
पुढं काय काय होणार
म्हणून झाले जर अधीर
तर ऐकवते लेक माझी
'असं काय गं आई
जरा धर ना गं धीर'
सध्याच्या कठीण दिवसात..
पूर्वीचे क्षण आठवायचे..
आताचे क्षण साठवायचे..
पण या सगळ्यात मात्र
आनंदाचे कण निसटू नाही द्यायचे...
मग बघा म्हणाल..
अरे काय चाललंय तेही चांगलं चाललंय!