वसुंधरेचे तुकडे पडले
वसुंधरेचे तुकडे पडले
वसुंधरेचे तुकडे पडले
जाती, धर्मांच्या नावे,
कुणी न तयार गावया
माणुसकीचे ते गोडवे...॥१॥
भूगोलाची कृपादृष्टी
जमिनीची विभागणी,
निर्मिती या देशांची
सैल झाली बांधणी...॥२॥
देश, वेश अन् द्वेश
सख्खे भाऊ वैरी,
कुणी मधुर आम्र
कुणी आंबट कैरी...॥३॥
उभारावी शिस्तीत
देशाची ही इमारत,
एक पाऊल चूकीचे
ढासळेल ही इभ्रत...॥४॥
कडक कायदेप्रणाली
सुटसुटीत शासन,
विविधतेतही एकता
एकठोकी स्पंदन...॥५॥
आदर संस्कृतींचा
वैचारिक व्यवहार,
मतभेदांची छाटणी
नको मानवी संहार...॥६॥
राज्य नसावे कारण
कारण असावे राज्य,
राज्याची भरभराट
करण्या असावे सज्ज...॥७॥
पुढारलेला पुढारी
निवडणूकीने निवड,
जनतेच्या हितासाठी
असावी ही धडपड...॥८॥
कणा अर्थव्यवस्थेचा
कृषी-कृषक मायबाप,
अंधश्रद्धा निर्मूलन
दंशधारी हा साप...॥९॥
स्वच्छ असावा देश
बांधवांचे मन स्वच्छ,
खरा धर्म माणुसकी
मैत्रीचा फुलावा गुच्छ...॥१०॥
लाच, भ्रष्ट दुराचार
समाज निर्जंतुकीकरण,
सुशिक्षणाच्या माध्यमे
संस्कारांची पाखरण...॥११॥
रक्षण करण्या धजावे
मायभूमीचे संरक्षण,
'देश' त्याला म्हणावे
ज्यात संस्कृतीचे दर्पण...॥१२॥