असेही
असेही
स्वबोध
बऱ्याच वेळेला मनात विचार येतो की रोज दोन-चार वाक्य का असेना पण स्वतःशी संवाद साधावा का? बहुदा नकारच येतो, कारण, पूर्वी वाटायचं मी स्वतःलाच सारखा डोह देते, घडलेल्या सगळ्या घटनांमध्ये - मग माणसं, परिस्थिती वेगवेगळे का असेना. आणि आताशा वाटतं की मी दोषच काढते - घटना, परिस्थिती, माणूस यांच्यामधले. खरंतर सगळ्याच ठिकाणी, सगळ्याच वेळी, सगळ्या गोष्टींमध्ये - सुवर्णमध्य काढता यायला हवा, नेहमीच.
तुमच्या मनाची-बुद्धीची-भावना-विचारांची जडणघडण तशी व्हायला हवी, लहानपणापासून. नसेल झाली तर लक्षात आल्यानंतर सुरुवात करायला हवी. आणि "आपले" म्हणवले जाणारे म्हणजे आईवडील, सख्खे बहिणभाऊ, नवरा/बायको, अपत्य यांनी अशावेळी योग्य साथ द्यायला हवी. त्या सुवर्णमध्याचं स्वागत करायला हवं किंवा तो सुवर्णमध्य काढण्यास मदत करावी, हातभार लावावा, त्यासाठी भरणपोषण करावं. त्याकरिता संवेदनशील असणं किंवा संवेदनशीलता निर्माण करायला हवी, जोपासायला हवी.
त्याशिवाय आयुष्य का मिळालं? जगण्याचा उद्देश्य काय? उद्देश्य सापडला तर त्यासाठीचे मार्ग, त्यावरील प्रत्यक्ष प्रवास? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि या प्रवासाचा आनंद म्हणजेच आयुष्य-जीवन जगणं सापडत जाईल!