बेपर्वाई
बेपर्वाई
"अरे निशांत नीट गाडी चालव आणि स्वतःची 'काळजी 'घे रे बाबा". निशांतला जो मोटरसायकलची किल्ली हातामध्ये बेफिकर पणे फिरवत निघत होता, आई सूचना देत होती.
निशांत आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा. वय होते त्याचे २५वर्ष. अत्यंत बेफिकीर. पैशांचा त्याला खूप माज होता. 'जीवनाचे' मर्म त्याला अजूनही कळले नव्हते. आई-वडिलांना त्याची खूप काळजी वाटायची.
आई बाबा, जीवनामध्ये व्यवस्थितपणा साधेपणा आणि नित्य नियमाची किती गरज आहे. हे समजून सांगायचे. पण ते त्याला कधीच 'पटले' नाही.
त्याला स्वतःच्या पैशांचा देखावा करण्याची खूप सवय होती. बी.कॉम ची डिग्री घेतली होती. वडिलांचा उद्योग तो बघत असे. पण त्यात सुद्धा तो फारसा रस दाखवत नसे.
त्याच्या सगळे लक्ष बाईकिंग करणे, बाहेर फिरणे, मुलींबरोबर बऱ्यापैकी वेळ घालवणे, ड्रिंक्स घेणे, पार्ट्या करणे यामध्ये त्याचा वेळ जात असे.
आईला बरेचदा वाटायचे की जीवनाविषयी जेव्हा निशांतचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होईल, त्यावेळी फारसा 'उशीर 'झालेला नसावा. या विचारानेच ती अस्वस्थ व्हायची
तो त्याच्या तऱ्हेने जीवनाचा आनंद घेत जगत होता.
खरंय, जीवनामध्ये सगळे सहजपणे मिळाले की त्याची किंमत आपल्याला उरत नाही. तसेच काहीसे निशांतच्या बाबतीत झाले होते. वडिलांनी कष्ट करून भरपूर पैसा मिळवला आणि त्याचा उपभोग मात्र निशांत घेत होता.
निशांतच्या बायकिंग ग्रुपने काश्मीर पर्यंत बाईकने जाण्याचे ठरवले होते. आणि त्याकरताच तो निघाला होता. त्याची आई त्याला सूचना देत होती. पण त्याचे तिथे लक्ष होतेच कुठे? तो तर आपल्याच मस्तीत निघाला होता. त्याचे सगळे लक्ष आता पुढच्या प्रवासाकडे होते.
त्यांचा ग्रुप निघाला. मजा करत आणि प्रवासाचा आनंद घेत ते सगळे निघाले. त्यांना घरची 'आठवण 'उरली नाही.
निशांत ची आई मात्र त्याच्या आठवणीत पूर्ण बुडाली होती. तिला निशांत सोडून काहीच दिसत नव्हतं. काहीतरी चाहूल तिला लागली होती.
बऱ्यापैकी अंतर पार करत ग्रुप हळूहळू काश्मीर कडे निघाला होता. सगळेच जण सारख्या वयाचे आणि बेफिकीर होते. त्यामुळे गाडी चालवताना फारशी काळजी घ्यायचे नाही.
हायवेवर गाडी चालवत असताना सुसाट वेगाने निशांत निघाला होता. पाऊस पडून गेलेला होता. काही अंतर पार केल्यावर त्याची गाडी घसरली आणि तो दूर फेकला गेला. त्याला भरपूर इजा झाली होती पण सुदैवाने त्याच्या डोक्यावर हेल्मेट होते म्हणून तो बऱ्यापैकी वाचला.
.. मित्रांनी त्याला दवाखान्यात नेले. बरेच दिवस तो दवाखान्यात होता पण जीवनाची 'क्षणभंगुरता 'त्याला एकाच क्षणात कळली.
त्याच्या आई-वडिलांनी मात्र मनोमन देवाचे आभार मानले "तू त्याला वाचवलेस पण जीवनाचे बरेच धडे शिकवले."