बेवडा
बेवडा
करिता प्राशन अमृताचे थेंब
उसळतो देही पराक्रमाचा डोंब
उतरता उदरी अमृत
पाश्चत्य भाषा जमते उत्तम
प्रसंग १ : गाव
गाणं म्हणतं दादाराम रस्त्याने चालला होता . त्याच्या दिवसाची सुरुवात पोटात दारू गेल्यानंतरच होते .
तो दारूच्या गुत्त्यावरून दारू पिऊन गावच्या पाराकडे निघालेला असतो .काही टवाळ पोरांचा घोळका एका झाडाखाली बसलेला असतो .त्यातला एकजण अचानक दादारामला येताना पाहतो .
सम्या - टोक ती बघ . सकाळ सकाळ टाकली वाटत आज दादारामनी .
तसं घोळक्याचं लक्ष दादाराम कडे जात .तो आपला डौलत डौलत सापासारखी नागमोडी वळण घेत रस्त्यावरून चालत असतो .त्याचं ते चालणं पाहून सगळेच हसायला लागतात .दादाराम स्वतःशीच काहीतरी बरळत असतो .
दादाराम - आपला नाद कुणी करत नाही आन कुणी करणार पण नाही .
दादाराम जसजसा जवळ येतो सगळा घोळका त्याची टिंगल करायचं ठरवतो .घोळक्यातलं एक वात्रट पोरग
आद्या - ए बेवड्या .
तसा सगळा घोळका हसायला लागतो. बेवड्या शब्द ऐकताच दादाराम चा मोर्चा घोळक्याकडे वळतो .
दादाराम - कार गाबड्या हो , आई बापानी काय चांगलं शिकावलय का नाही ?
घोळका शांत .मधूनच एकजण बोलतो .
नान्या - व्हय पाटील हीकडं कुठं ? सकाळ सकाळ .
दादाराम - कोण पाटील ?
नान्या - आव तुम्हीच .दुसरं कोण ? तुमचा नाद हाय का राव गावात .
दादाराम - हा मग आपला कुणी नाद करत नाही आन नदी बी लागत नाही .
घोळक्यातलं आणखी एक टवाळ पोरग .
बाब्या - हा गावाला तेवढच कामय तुझ्या सारख्या बेवड्याच्या नादी लागायच.
दादाराम - ए कोणय र त्यो ? म्हंजी आमी पेलोय का ?
नान्या - मग हिकडं कुठं ? गेलता सकाळ सकाळ.
दादाराम - परसाकड गेलतो .
सगळी घोळक्यातली हसायला लागतात .
नान्या - इतक्या लांब ?
दादाराम - आरं बाबा . गावात आलो होतो आन फिरता फिरता एकदमच मुरडा मारला पोटात .
नान्या - राती आद्याच्या जागराणात तरी जास्त वडली काय ?
आद्या - आरं ५ भाकरी खाल्या ह्यानी .
नान्या - मग त्याचं जोर हाणित असत्याल.
दादाराम - का ? तुझ्या बापाचं काय गेलं त्यात .
आद्या - काय पाटील खोटं बोलताय राव .भकाभका वास येतोय दारूचा हितपर .
नान्या - वासानी पार आम्हाला चढायची येळ आली .
दादाराम - ए बेन्या गप . त्यो दारूचा वासय का ? बावळाटा .
त्याचं बोलणं ऐकून सगळी नाकाला हात लावतात . दादाराम खाली पायजम्याकडं पाहतो आणि पोरांना म्हणतो .
दादाराम - ए गाबड्याहो काय बी कस बोलताय र . दाखवू काय इंगा मग आपला .एका बुक्कीत दात पाडीन सगळं .
नान्या - मंग खरं सांग कुठं गेलता ?
दादाराम - आरं परसाकडला गेलतो म्हण.
आद्या - आरं पिऊन आलंय ही .खोटं बोलतंय .तुला आंबाट वास यायना व्हयं .
दादाराम - आरं त्यो शेंट मारलाय म्या शेंट .त्याचा वास हाय त्यो .
नान्या - आसला कसला ? दारुगत वास येती त्याची .
दादाराम - बाहेर देशातून माघवलाय . इम्पॉर्टन्ट हाय .
आद्या - काय हाय ?
दादाराम - इम्पॉर्टन्ट .
नान्या - आरं इंपोर्टेड म्हणायचं आसल त्याला .
मग सगळं घोळका परत हसायला लागतो .
दादाराम - ए हासायला काय झालं .हासायला काय झालं ? बुक्कीत दात पाडीन .
दुबई वरून आणलाय दुबईवरून .
नान्या - अय्यो .दुबईवरून .
दादाराम - मंग .
आद्या - काय तुझा बाप होता तिथं का आई कामाला .
दादाराम - ए बेन्या . माझा आजा गेलता तिकडं .
सम्या - कशाला ?
नान्या - हाजामती करायला .तिथल्या लोकांच्या .
पुन्हा सगळ्या घोळक्यात हशा पिकतो .दादाराम रागराग उठतो आणि खूप दारू पिल्याने खाली पडतो .पुन्हा सगळे त्याला हासतात .
नान्या - पाटील दमानी .दमानी .
दादाराम - तू मला शिकिवतो का आता ? LLLLLB शिकलोय .
आन म्या काय पडलो नाय .व्यायाम कसा करायचा ते शिकिवतोय तुम्हाला .
आद्या - हा राहूद्या पाटील .
सम्या - पिऊन पिऊन छातीच्या फासुळ्या आल्यात वरती आन ह्यो आपल्याला शिकिवणार व्यायाम .
प्रसंग २ : पहार
दादाराम उठतो आणि डौलत डौलत पाराकडे निघतो . घोळका पाठीमाघून ए बेवड्या , ए बेवड्या करत त्याची टिंगल करत असतात .दादाराम पारावर पोहचताच .दोनचार लोक तिथं बसली असतात .एक प्रतिष्ठित व्यक्ती ( अण्णासाहेब ) लोकांना काहीतरी सांगत असतात .दादाराम चं आणि त्याचं नखभरही पटत नसतं .
दादाराम - राम राम मंडळी .
अण्णासाहेब लगेच त्याला पाहून रागाला जातात पण तो पिलाय हे पाहून काहीच बोलत नाही .ते पुढे बोलू लागतात .अण्णा मुद्दाम खोचक बोलतात .
अण्णासाहेब - माणसानी कस शांत मधी जगल पाहिजे . दारू वगैरे ,व्यसन लय वाईट .बेवड्याची पदवी कशाला फुकट .
समोर बसलेली मंडळी मान डोलावत्यात .बेवडा म्हणलं की दादारामची सटकती.त्याला समजत की अण्णा आपल्यालाच बोलत्यात .
दादाराम - शान मधी जगल पाहिजे आणि बायकूनी आतून कधी लावून कोपऱ्यात घालून हाणल पाहिजे .
तसा सगळ्या घोळक्यात हशा पिकला .कारण अण्णांची बायको हौसा लय कडक लक्ष्मी .
अण्णा - दाद्या मी तुला बोलत नाही .
दादाराम - म्या तरी तुम्हाला कुठं काय म्हणतोय .म्या घेतलंय का तुमचं नाव ?
अण्णा - नाय .
दादाराम - मंग .
अण्णा शांत बसतात .सगळा घोळका मुरक्या मुरक्या हासत असत्यात .दादारामच्या एकाच डायलॉग मध्ये अण्णा शांत बसतात .
अण्णा - तू जा इथून .
दादाराम - जा मजी .
अण्णांचं दोन गाडी बाजूलाच असतात .ते त्यांना इशारा करतात की ह्याला इथून हाकला .ते गडी दादाराम कडे वळतात .पिळदार शरीर पाहून दादाराम थोडा घाबरतो .
दादाराम - जातोय . हात लावायचं काम नाय .बुक्कीत दात पाडीन .
अण्णा - हा निग.
तिथून निघून दादाराम अण्णांचे दुशमन आबासाहेबाकडे जातो .त्याला अण्णांनी हाकललं असतं त्याचा अपमान झालेला असतो .त्याचा बदला घेण्यासाठी त्याच्या मनात एक कल्पना येते .आबा हाटेलात काही मंडळींना चहा पाजत असतात .
दादाराम - राम राम आबासाहेब .
आबासाहेब - राम राम दादा . आज सकाळ सकाळ घेतली वाटतं .
दादाराम - नाही राव आबा .
तो आबाजवळ जातो आणि आ वासून बघा बरं म्हणतो .
आबाला वास नकोसा होतो आणि त्याला लांब करण्यासाठी नाही म्हणतात .
दादाराम - बरका आबा. आपल्या मनात तुमच्या इषयी लय प्रेम .पण ..
आबासाहेब - पण काय ?
दादाराम - जाऊद्या .आता काय ?
आबासाहेब दरडावून विचारतात .
आबासाहेब - दाद्या सांग काय झालं ?
दादाराम - अहो त्यो अण्णा तुमच्या इषयी काहीतरी बोलत होता .म्हणत होता .शानमधी जगलं पाहिचे नुसतं कडक कपडे घालून काय फायदा .नुसत्या गप्पा नाही मारल्या पाहिजे मोठ्या मोठ्या .
आबासाहेब - आसं होय .कुठाय तो अण्णा ?
आबासाहेब आणि त्यांचं दोन - तीन गडी आपला मोर्चा अण्णांकडे वळवतात .दादाराम ठिणगी टाकून मोकळा झाला होता . तिकडे अण्णा ही जोमात आले आबासाहेबाला पाहून .दोन गटात बघता बघता चांगलीच बाचा बाची सुरु झाली आन हाणामारीही लागली . परिस्थिती हाताबाहेर जाताच दादाराव तिथून पळ काढतात आणि घरात पोहचतात .
प्रसंग ३ : घर
दादाराम घरी पोहचतात .त्यांची बायको आशा घरात बसलेली असतें .
दादाराम - ए आशे जेवाय वाढ.
आशा - झाली का गिळायची आठवण .फक्त तेच जमत खायचं आणि मुतारा ढोसायचा .
दादाराम - मुतारा नाय अमृत हाय अमृत .
आशा - हा पिऊन अमर होणारे .
दादाराम - हाळु बोल .गावात इज्जत हाय माझी .ऐकलं कुणी .
आशा - मुडदा बशीवला त्या इज्जत देणाऱ्यांचा .
आशा एका ताटात भाजी भाकरी आणि तांब्या भरून घेऊन येते आणि दादारामच्या पुढे आदळते जोरात .
आशा - हमम गिळा.
दादाराम - हाळु .जमिनीला खड्डा पडल आणि पाणी लागलं.
आशा - हमम .
दादाराम - एवढं काय झालं .जेवू का नगो मग .
आशा - काय नाय गिळा .
दादाराम - काय झालं ? माझी राणी रुसली वाटतं .
आशा - हा दारू पिल्यावरच राणी वाटते व्हय मी .
दादाराम - आगं तसं नाय .पण काय झालं ?
आशा - घरात भाजीला काय नाय ? धान्य संपत आलय लक्षच नाही घरात .नुसती आपली दारू ढोसायची .
दादाराम - तू यादी कर काय काय लागतंय ती .
आशा - हा . आन त्याला पैसं कुठून आणायचं ?
दादाराम - लय पैशेत आपल्याकडं .
आशा - काय दरोडा टाकला का काय कुठं ?
दादाराम - जास्त बोलू नगो .सांगितलं तेवढं कर .
आशा - हमम .
दादाराम - तुला सोन्यानी मढवीन एवढा पैसा हाय .
आशा - मला सोन्यानी मढवणार आणि खाणार काय माती .
दादाराम - तुला तर कशाचचं कौतुक नाय .
आशा - हमम .काय बघावं आता मोठा पराक्रम गाजवून आलायत ना .म्हण कौतुकच नाय .
..
दादारामला आठवतं की पराक्रमच गाजवलाय अण्णांची आज चांगलीच जिरवली .मुकाट्यानं जेऊन घेतो आणि तिथंच आडवा होतो .