माऊली
माऊली
सुनेचे फोनवरचे बोलणे जाता जाता सहज कानावर पडले.सून म्हणत होती आत्ता नाही गं जमत तिकडे यायला.यांना रजा नाही.मुले पोहायला जातात त्यांचे महिन्याचे पैसे भरलेत ते वाया जातील.खरंच आत्ता नाही जमणार.आणि तिने फोन खाली ठेवला.तसं मी म्हंटलं अगं असं करु नकोस.जाऊदेत पैसे वाया.आई बोलावतीय तर तू जा माहेरी.
मला माझे पूर्वीचे दिवस आठवले.आत्तासारखं फोनवरुन झटपट निर्णय घेण्याचे दिवस नव्हते ते.पोष्टाने पत्र यायचे ते जावईबापूना.म्हणजे यांना.पाठवता का लेकीला चार दिवस?खरंतर यांची काहीच हरकत नसायची.पण माझाच पाय निघायचा नाही.असं वाटायचं यांचे जेवणाचे हाल होतील.बरं माहेरी गेलं की सगळ्याच भावंडाना एकदम यायला जमायचं नाही.मग थांब आणखी दोन दिवस,असं सगळी म्हणायची.मग पाय निघायचा नाही.आईशी पोटभर गप्पा मारुन व्हायच्या नाहीत.कसंतरी मन आवरुन आपल्या आपल्या घरी यायचं.
हे आपलं आपलं घर ही एक वेगळीच कल्पना आहे नाही का?माझ्या कन्येचा माझ्यापेक्षा वडीलांवर जीव दांडगा.माहेरी गेलं की रात्रभर आप्या आप्या घरी चल.आणि आण्णाओ म्हणून सूर काढायची.एकत्र जमलं की मुलांच्या खोड्या , भांडण चालायचं.माहेरी पोचलं की अगदी स्वत:ची कपबळी धुवायचाही कंटाळा यायचा.नुसतं पायावर पाय टाकून गप्पा रंगायच्या. आणि घरी आलं की घरची स्वच्छता करायची म्हणजे देव आठवायचा. लग्नकार्यात उभाउभी गेलं की आईचे डोळे भरुन यायचे.तेव्हा आपण आपल्या संसारात इतक्या मग्न असतो ना कीं, कुणाकडूनतरी माहेरचा "येऊन जा म्हणावं तिला" असा निरोप आला की वाटायचं सारखं कशाला बोलावायचं ? इतका वेळ आहे कुणाकडे?
पण आता ६५ नंतर वाटतंय.माहेर असावं.खूप खूप मनातलं बोलायला आई असावी.म्हातारपण मोठ्ठ अवघड आहे.वेळ भरपूर आहे,बोलायलं शब्द आतूर आहेत,पण ऐकायला कोणाकडे वेळ नाही.घरातल्यानी कुठं जायचं ठरवलं तर घरातल्यां म्हाताऱ्यांची सोय आधी बघायला लागते.तरुणपणी"कशाला जायचं लग्नाला?कोणीतरी एकानं या जाऊन"असं म्हणणारी व्यक्ती म्हातारपणी नुसतं कुणी या म्हणायची खोटी लगेच जाऊयाच म्हणून पाठीस लागते.
""लागले नेत्र हे पैलतीरी"अशी अवस्था असली तरी मनाचं तारुण्य कमी होत नाही.आणि "आशा नाम मनुष्याणां........उक्ती प्रमाणे खूप जगायचीपण इच्छा असते.नाही का......