मन आणि अंतरआत्म्याचा संवाद
मन आणि अंतरआत्म्याचा संवाद
आत्मा : काय पुन्हा पुन्हा रडतेस, आता कोण काय बोललं आणि आपलं ठरलं आहे ना वाईट वाटून घ्यायचं नाही म्हणून मग परत का उदास??
मन : तुला काय जातं बोलायला.. तुझ्या इतकी प्रॅक्टिकल नाही मी, वाईट तर वाटणारचं ना जेव्हा प्रामाणिक काम करून देखील आपल्याला चुकीचं समजलं जातं, जेव्हा वैयक्तिक इतका तणाव सुरू असून देखील इतरांना आनंद मिळावा यासाठी आपली दुखणी बाजूला सारून त्यांच्यासाठी आपण सर्वस्वी वाहून देतो..
आत्मा : पुन्हा तेच, आता या पुढे मी समजावू शकत नाही, कितीवेळा सांगितलं कर्म करत रहा फळाची अपेक्षा करू नको, हे कलियुग आहे आणि दिल्या घेतल्याचे जन हे सारे अंत काळाचा.. इथे कोणी सखा नाही. तरी पुन्हा तेच मला माहित आहे ना तुझ्याकडून तू १००टक्के प्रयत्न करते, मी तुझ्यात वसलेला परमेश्वराचा अंश तर आहे. तू आईच्या उदरात असता पासून तुझा सांभाळ मी करतो आहे. माझ्याही अपेक्षा तू भंग करतेस मग मी कधी तुला जाब विचारलं का? कोणी काही बोललं की लगेच दुःखी होतेस, स्वतःची काळजी घेत नाहीस, मी तुला इतकं छान शरीर दिलं त्याच्यावर तू नावं कोरलीस, सतत त्या कालियुगातल्या आदिष्टनाला डोळ्यासमोर ठेऊन नेत्राची पुण्याई घालवलीस डबल भिंगाचा चष्मा लागला, कानात सतत earphone घालून आता कानाची पण पुण्याई कमी होत चालली आहे, तुझ्या रक्षणासाठी दिलेली उपासना करण्यास टाळतेस. तरी तुझा हेतू शुद्ध आणि प्रामाणिक आहे म्हणून तुझी मी साथ देतो. मी सगळं पाहतो आहे, तू शांत कर्म करत रहा.
मन : नाही होत आता सहन, इथे जखमेवर फुंकर मारणारे कमी आणि ओरबडणारे जास्त आहेत मग ते वैयक्तिक असो किंवा व्यावसायिक, शिवाय प्रकृती देखील साथ देत नाही, दोन्ही गुडघ्यात गॅप आहे, प्रचंड वेदना सहन करती आहे, रक्तताप, मायग्रेन हे सगळं हसतमुखाने सहन करते, कधी चेहऱ्यावर आणत नाही. तर वाईट वाटणारच ना, परदेशात सगळी कामं स्वतःला करावी लागतात, कधी कधी तर इतकी थकून जाते की न जेवताच झोप लागते, सगळ्यांना वाटतं वाह परदेशात राहते काय नशीब ना.. पण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे हे उगीच म्हणत नाही.
आत्मा : अगं बाई नेहमी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींनाच विरोध झाला आहे, तू कोण इतकी मोठी आलीस तुलाही परीक्षा आहेच की. हे त्रास शूलक आहेत आणि इतक्यात ढासळली. वैयक्तिक घरगुती त्रास प्रत्येकाला आहेत, लहानपणी भातुकलीचा संसार तू मांडला, प्रपंच तू मागून घेतलास मी फक्त तथास्तु म्हंटलं, लग्नात अंतरपाट सुरू असताना मी तुला "सावधान" अशी चेतावणी दिली होती तेव्हा का नाही मागे फिरलीस मग आता का रडतेस आणि व्यावसायिक बोलायचं झालं तर ज्यांना विचार पटत नाही त्यांच्यासाठी वाट मोकळी ठेव, उद्या तुझ्यासोबत दहा माणसं राहिली ना तरी चालेल त्या दहा माणसांची पुढे जाऊन दहा हजार कशी करायची हे माझ्यावर सोड. तुझं इथे काही नाही. करता करविता मी आहे, तुला दिलेलं शरीर देखील भाड्याचं आहे ते जसं च्या तसं शेवटी इथून जाताना मला सोपवायचा आहे, तू माझा फक्त एक अंश आहेस पुन्हा सांगतो. तुला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही.
मन : बरं ठीक आहे तू सांगितलेलं सर्वकाही कळतं मला.. पण वळत नाही! शेवटी मी मनुष्यप्राणी, सहजासहजी समजलं असतं तर माझ्याही नावापुढे संत ही उपाधी लागली असती नाही का? ठीक आहे मी करेल प्रयत्न पण पुन्हा कधी खचले तर मला समजवशील ना?
आत्मा : निश्चितच मी कुठल्याही रुपात येऊ शकतो, तुझ्यापेक्षा लहान थोर, तू मला कश्यात बांधून नको ठेऊ, मी येत्र तत्र सर्वत्र आहे. आणि इथे तिथे शोधण्यापेक्षा मला अंतरातून हाक मार मी सदैव तुझ्यातच आहे ही ओळख तू घे. चला लाडोबा झोपा आता पुष्कळ रात्र झाली आहे. मी आहे सदैव तुझ्या पाठीशी नको काळजी करू.