आठवणीतील शाळा
आठवणीतील शाळा
शाळेत असतांना पेपर मध्ये आम्हाला हमखास *”माझी शाळा”* या विषयावर निबंध लिहायला असायचा.. पण तेव्हा काही वाटायचं नाही जे आम्ही करत होतो,वागत होतो,जे आमच्यासोबत घडत होतं ते सर्व काही लिहत असायचो.पण आता *”माझ्या आठवणीतील शाळा”* ह्यावर लिहायचं म्हटलं तर डोळ्यासमोर जुन्या आठवणी एकदम ताज्या झाल्या आहेत,काय लिहावं आणि काय नको असं झालं.
अंगणवाडी मध्ये असतांना शाळेत जाणाऱ्या मुलांकडे बघतांना नेहमी वाटायचं की ‘आपण कधी शाळेत जाणार,कधी आपल्याला निळा-पांढरा गणवेश घालायला मिळणार” याची आतुरतेने वाट बघायचो.
पहिल्या दिवशी शाळेत गेल्यावर आम्हाला नवीन प्रवेशित विद्यार्थी म्हणून नवीन “पाठयपुस्तके” देण्यात आली. खूप दिवसापूर्वी बघितलेले स्वप्न तेव्हा प्रत्यक्षात उतरलेले होते.वेगवेगळ्या विषयाची ओळख झाली. मराठी,इंग्लिश,गणित विषयाची पुस्तके होती.
खरंच या शाळेमुळे सोन्यासारखे मित्र-मैत्रिणी मला मिळाले. त्यांच्या सहवासात राहून मला खुप नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या..! आम्ही सर्व जण लंगडी,लगोरी,कब्बडी,क्रिकेट,खो-खो,लपंडाव,चोर-चिठ्या असे कित्येक खेळ एकत्र मिळून खेळलो…!
शिक्षकांनी योग्यवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळे शालेय जीवनात जे आमच्यावर संस्कार झाले ते आता आम्हाला भविष्याची शिदोरी म्हणून उपयोगी पडत आहे. माझी शाळा माझ्या छोट्याश्या जीवनात आई-बाबा,बहीण-भाऊ,मित्र-मैत्रीण,गुरुजन वर्ग अशा अनेक पात्राची ओळख करून दिली.आयुष्यात पुढे जात असताना मी बऱ्याच वेळा मागे वळुन शाळेच्या त्या वर्गांत डोकावतोच आणि जुन्या आठवणींत रमतो. आयुष्यात काही क्षण असे असतात की,त्या क्षणांची नुसती आठवण जरी झाली तरीही चेहऱ्यावर आनंदाचे अश्रू येतात…!