मनातलं म्हणजे काय
मनातलं म्हणजे काय
माझ्या शेजारी एक मध्यमवर्गीय कुटुंब राहत. घरात काका काकू दोन मुलं, सुना आहेत. मोठ्या सुनेकडून काकूंना नातू मिळाला, त्या बाळाचे घरात आनंदाने स्वागत झाले बारसं, वाढदिवस इत्यादी कार्यक्रमांचा बेत आखला गेला. वातावरण अगदी आनंदी होतं, तोच काही दिवसांनी दुसऱ्या मुलाला मुलगी झाली तर वातावरण क्षणात बदलून गेलं ही बातमी आठ दिवसांनी कॉलनीत सांगण्यात आली कारण सगळे नाराज होते, म्हणून एकच निष्कर्ष काढता येईल की आज ही आपल्या समाजात मध्यमवर्गीय कुटुंबात मुलीचा जन्म आनंदा ऐवजी चिंतेचा विषय आहे. अशा सभोवतालच्या विपरीत घटना बघून कधी कधी मन खूप व्यतीत होते व उदास वाटते , ही एक साधी गोष्ट
मध्यमवर्गीय कुटुंबात बहुतांश पालकांना आज मुलगी नकोच असते आणि असलीस तर तिने पालकांनी जेवढे सांगितले तेवढेच आणि तसंच वागावे असा बहुदा प्रत्येक पालकांचा मानस असतो असे मी स्त्री मुक्तीवादाच्या हेतूने बोलत नाही तर हा एक स्वानुभव आहे
एकदा मला माझी बालमैत्रीण बाजारात भेटली. माझे लग्न आई-वडिलांनी ठरवले हे सांगताना फारसे आनंदी वाटत नव्हती. अगोदरपासूनच अतिशय शांत स्वभावाची होती, शाळेमध्ये ही फारशी बोलत नव्हती तिच्या वागण्यावरून तरी नेहमी मला वाटायचे तिचे सगळेच निर्णय म्हणजेच अभ्यास, करियर विषयीचे तिच्या घरातले मोठे लोकच घेत असतील. बहुदा आपल्या मताने आपल्या मनासारखे आपले निर्णय घेता येऊ शकतात हे तिला माहीतच नसेल कदाचित. यापुढे पुढील जीवनाचे सगळे निर्णय आता नवराच घेईल असा एकंदरीत अंदाज तिने घेतलाच होता.
अर्थात, पालक आपल्या पाल्यांसाठी चुकीचे निर्णय घेतात असे अजिबात माझे म्हणणे नाही , पण एक अस्तित्व म्हणून मुलीलाही तिचे स्वतःचे मत आणि तिचे मन काय बोलते हे एकदा ऐकण्याची आणि सांगण्याची संधी मिळावी. तिच्याकडे बघून उगाचच मला वाईट वाटत होते व नकळत तिच्या डोळ्यातला एक प्रश्न मला त्रास देत होता तो प्रश्न म्हणजे 'मनातलं म्हणजे काय ग?'