प्रायव्हसी !!
प्रायव्हसी !!
आपल्या आयुष्यात आपल्याला जे हवं ते अगदी सहज मिळणं म्हणजे खुप नशीबवान असावं लागतं . असंच काहीसं सध्या गीतासोबत घडत होतं . आत्ता पर्यंत तिने स्वतःसाठी कधी काही मागितलं नव्हतं .आणि आता थोडफार मिळत होतं तर ते पण जणू काही तिच्या नशिबात नसल्यासारखं , हळू हळू निसटून चाललं होतं . कोणाला दोष देवू कळत नव्हतं .पण जो काही मनस्ताप होत होता त्यामुळे गीताची चिडचिड वाढत होती . मागच्या २ - ३ महिन्यांपासून तिला अगदी निवांत वेळ मिळत होता . लग्न झाल्यापासून ३५ वर्षात तिला असं रिकामं बसायची सवय नव्हती . एकत्र कुटुंब , सासू - सासरे , एक दिर - जावं ,स्वतःची दोन मुले ,दिराची दोन ! जावेला नोकरी होती ,त्यामुळे ती दिवसातले ८ तास बाहेर . सुट्टीच्या दिवशी त्यांचे प्लॅन ठरलेले असायचे .
गीताचा नवरा तसा फारसा घरात लक्ष देत नसायचा . घरात लागतील तेवढे पैसे पुरवायचे , एवढीच स्वतःची जबाबदारी तो समजत होता .
इतरांना त्याचा पैसा मिळायचा त्यामुळे त्याला टोकायची कुणाची हिम्मत नसायची . गीता त्याच्याकडे दुर्लक्ष करून स्वतःला घरकामात गुंतवून घ्यायची .सगळ्यांची उठबस करण्यातच तिला दिवस पुरतं नसायचा . दिवस सरले , एक एक जबाबदारीतून ती मोकळी होत गेली . सासरे वारले , दिराने नवीन घर बांधले तसे सासू सहित , त्याचे कुटुंब तिकडे राहायला गेले .गीताच्या मुलीचे लग्न झाले . वर्षा दिड वर्षाने पहिलं बाळंतपण झालं . मुलगा पण शेवटच्या वर्षाला. हळू हळू हे रिकामटेकडे बसणे गीताला जड जावू लागले . मुलीने मग नवीन फोन आणून दिला .त्यावर वेळ घालवता यावा म्हणून त्यातले काही नवीन नवीन ॲप डाऊनलोड करून दिले .
असच सहज फेसबुक पेज बघताना तिला कथा - कविता समुह नजरेस पडला. लग्न आधी कधीतरी चार ओळी खरडल्या होत्या , त्याची आठवण होवून पुन्हा काही जमतंय का म्हणून लिखाणाला सुरुवात केली. हळू हळू त्या गृपला जॉईन होवून गीता कथा कविता पाठवायला लागली . मिळणारा प्रतिसाद तिच्या लेखनाचा हुरूप वाढवत होता . ग्रुप तर्फे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा तिच्या लेखनाचा सन्मान पत्र देवून गौरव करत होता . सगळं काम कधी उरकते आणि कधी लिहिते असं तिला होऊ लागलं .काम करता करता डोक्यात काहीना काही सुचत रहायचं . आता वेळ कसा घालवायचा याची खंत नव्हती , रिकामं कधी होतंय याचीच चिंता पडायची गीताला . एकंदर छान गणित जमलं होतं सगळ्याचे . पण म्हणतात ना ,सुखाला कधी कोणाची नजर लागेल , सांगता नाही येत .
मुलगी मेघा , इंजिनियर , मोठ्या पोस्ट वर काम करत होती .एक मोठे प्रोजेक्ट त्यांच्या कंपनीला मिळणार होते ,त्यासाठी मेघाची निवड झाली होती . बाळ ७-८ महिन्याचे होते म्हणून इतके दिवस घरातूनच काम करत होती .पण आता मात्र ऑफिसला जायला हवं होतं . मेघा एकटीच होती ,नवरा पण त्याच फिल्ड मधे .सासू सासरे गावाला , एक अविवाहित दिर , तोपण गावाला . इतके दिवस कंपनीने सांभाळून घेतलं होतं पण आता जमणार नव्हतं . बाळाला पाळणाघरात सोडायला त्या दोघांचे मन तयार नव्हते .बरं , पाच आकडी पगाराची नोकरी सोडणे पण शक्य नव्हते . विचारांती मग बाळाला गीता जवळ ठेवायचा निर्णय झाला , सोबत एक मुलगी पण ठेवायचे ठरले म्हणजे आईला जास्त लोड नाही येणार , सर्वांच्या मते गीता आता सगळ्या जबाबदाऱ्या मधून रिकामी होती .मग बाबांना विचारून आईला हा निर्णय सांगितला . तिचा नकार असू शकत नाही असेच सर्वांनी गृहीत धरले .मुलगी पण आहे कामाला मग आईला कशाचा ताण येणार नाही असाच सर्वांचा विचार ! गीताचा दिवस पुन्हा त्याच गडबडीने चालू झाला . मेघा घरचं आवरून बाळाला आणि मीनाला ९ वाजता आणून सोडायची . तोवर गीताला तिच्या घरातलं सगळं आवरायला लागायचं .
दिवसभर बाळाच्या बाळंतपणात दिवस कसा सरायचा तिला कळत नव्हते , मीना १० वर्षाचीच होती , तिला पण जास्त काही जमत नव्हते .हाताशी असायची एवढंच तिचं काम . बाकी गीता मात्र आलेलं आजी रुपी आईपण नव्याने अनुभवत होती . ३-४ महिने गेले अश्याच धावपळीत .गीता आता जरा कंटाळली होती खरंतर . तिला तिच्या आवडीच्या कथा कविता लिहायला वेळच मिळत नव्हता . फोन बघणं पण होतं नसायचं . आता तर ओमला आजीचा लळा लागला होता , त्यामुळे तोही आईसोबत जात नसायचा .मग कामाच्या नावाखाली , कधी खुप दमले आहे म्हणून मेघा त्याला बऱ्याच वेळा रात्री सुध्दा ठेवू लागली होती . सुट्टीच्या दिवशी सुध्दा कधी दोघांना बाहेर जायचे म्हणून पण सोडू लागली .
गीताची मात्र आता फारच कुचंबणा होत होती . तिचं आयुष्य चार भिंतीत , आधी सारखं बंदिस्त व्हायला लागलं होतं . तिला या गडबडीत स्वतः साठी सुध्दा वेळ मिळत नसे . नवरा पण आताशा घरातच असायचा , त्याची काही मदत तर नाही पण त्याचेच जेवणाचे नखरे सांभाळावे लागायचे .मुलगा सकाळी जायचा तो रात्री यायचा . गीताला कधी कधी स्वतःच्या सहनशीलतेचा खुप राग यायचा , वाटायचं बोलावं फटकन मुलीला की , तुला पैसाच हवा होता तर बाळाची का जबाबदारी घेतली ? त्याला काय माझ्या जीवावर जन्म दिला आहेस का ? का तुम्हाला असे वाटत नाही की आपली आई आत्ताच कुठे सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून मोकळी झाली आहे .इतकी वर्ष तिने दुसऱ्याचं करण्यात घालवली आहेत , आता तरी तिने स्वतःसाठी जगावं . काही नाही तर निदान थोडा आराम तरी घ्यावा ,
" वय ४८ आहे आता माझे पण , नशिबाने आज पर्यंत काही शारीरिक आजार नाही की कसले दुखणे नाही .मग जरा आतापासून काही काळजी घेणं गरजेचं नाही का ? "
" सगळे दिवस असेच रहाणार आहेत का ? "
" जो तो आपल्या विश्वात मशगुल आहे पण माझे विश्व अजूनही ह्या चौकटीत बंदिस्त का ?"
" मला काय हवं आहे हे कधी कोणाला विचारावेसे वाटत नसेल का ?"
" आई असले तरी मलाही काही करावंसं वाटतं .मलाही आता काही स्वप्न आहेत . जगायचय मला माझ्या मनासारखं ! "
खुप अस्वस्थ व्हायची गीता ह्या विचारांनी .कधी कधी वाटायचं , " मुलांनी त्यांच्या गरजेला आईची अपेक्षा नाही करायची तर मग कुणाची अपेक्षा करणार ? आणि बाळ काय असाच रहाणार आहे का ? मोठा होईल तेव्हा मग का येईल तो माझ्या जवळ ? अजून थोडे दिवस तर सांभाळायचे आहे मग आहेच की आपली आपल्याला प्रायव्हसी ! "
परत विचार यायचा अजून ३_४ वर्ष तरी हे असच चालणार ,मग तोवर मुलाचे लग्न होईल ,त्याची मुले होणार मग परत आपलं
अडकण आहेच "...
मग काय करणार???......
" किती छोटी आहेत माझी स्वप्न ! "
" सकाळी निवांत उठावं... मोकळ्या हवेत थोडं चालून यावं ...घरात थोडासा व्यायाम करावा ... मग अंघोळ , देवपूजा .... मस्त आवडेल ते नाश्त्याला करून खावे.... मग निवांत पेपर वाचन , मनात घोळणाऱ्या दोन चार ओळींच्या कविता , कथा लिहिणे .. दुपारी गरम गरम स्वयंपाक ,मग झोप..
संध्याकाळी चहा , बागेत नाहीतर एखाद्या देवळात देवदर्शन करून फिरायला जाणं.. रात्री हलका आहार घेवून आवडीचे टीव्ही चे प्रोग्राम बघत झोपणं" ....खुप मोठी आहेत का स्वप्न ??? कधी मिळेल का एवढ्यासाठी माझी मला प्रायव्हसी ???
घराघरात असणारी प्रत्येक स्त्री काहीना काही स्वप्न बघतच असेल .. त्या गृहिणी कधी व्यक्त होत असतील ...कधी अव्यक्त !! मग त्या घरातल्या पुरुषाने त्यांचे स्वप्न जाणून घेवून , द्यावे त्यांच्या स्वप्नांना बळ !! देणार ना !! बघा जमतंय का ??