चाकोरी एक बेडी #फ्री इंडिया
चाकोरी एक बेडी #फ्री इंडिया
तुझे हे वागणे चाकोरीबाहेरचे आहे. समाज आमच्या तोंडात शेण घालतोय, आमची छी-तू झाले. लग्न झाले की सासरच घर हेच आपले घर आणि सासरची माणसे म्हणजे सर्वस्व असते आणि ही मुलगी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करून आले. त्यांनी वेडं ठरवलय हिला. प्रत्येक स्त्रीने आपली चाकोरी बघून रहाव. विजयराव अतिशय तावतावाने बोलत होते.
अहो तिची बाजू तरी ऐकून घ्या हो. आपली मुलगी अशी का बरे वागेल? मला माझ्या मुलीवर मी केलेल्या संस्कारांवर विश्वास आहे. ती ते घर सोडून आल्या पासून एक शब्दही बोलत नाही आहे. झाल्या प्रकाराने ती पण गांगरून गेले हो. जयाताई गहीवरून म्हणाल्या.
विजयराव तिथुन निघून गेले. थोडा वेळ कोणीच कोणाशी बोलले नाही. हातात छोटी चिमणी तिच्याकडे बघून दोघी माय- लेकीनी आवंढा गिळला.
विजयराव पाटील अतिशय प्रतिष्ठीत व्यक्ती.. तसे मुलगा मुलगी भेदभाव मानणारे तें नव्हते. पण समाजाची चाकोरी उलटून त्यांनी कधीच काही केले नव्हते. त्यांची इज्जत, अब्रू आज चव्हाट्यावर आली त्यामुळे त्यांचा आत्मसम्मान दुखावला गेला होता. म्हणुन आज पहिल्यांदा मुलीच्या जातीला असलेली चाकोरी त्यांनी बोलुन दाखवली. आज त्यांची मुलगी मालाला वेडे ठरवून सासरची माणसे गावात येऊन वाटेल तें बोलुन गेले होते.
पण यात चूक कोणाची हे न शोधता त्यांनी सुद्धा मुलींना असलेले बंधन, बाईच्या जातीने कसे चाकोरीत राहावे हे सांगून आपल्या मुलीलाच बोल लावले. रात्रभर तळमळत होते. शेवटी जयाताई त्यांच्या जवळ येऊन शांत आवाजात म्हणाल्या. तुम्हाला राग येणार नसेल तर मी बोलू का?
लग्न झाले अन् लगेचच तिच्या लक्षात आले, घरात सर्व बुरसटलेल्या विचारांचे आहेत. घरच्या लक्ष्मीला अतिशय घॄणास्पद वागणुक द्यायचे हो.. बायकांना त्या घरात काडीचीही किंमत नव्हती. पण लोकं काय म्हणतील? या भीतीपायी तिने स्वतःला या पिंजर्यात अड़कुन घेतले.
मलाही एका शब्दाने कधी सांगितल नाही तिने. खूप सोसले हो एकटीनेच..
गोड बातमी आली आणि सर्वांचे रूप पालटले. तिचे कौतुक, डोहाळे काही विचारू नका... खूप खुश झाली ती. तिला वाटले आता हे दॄष्टचक्र संपून जाईल. जसे जसे महिने पुढे जाऊ लागले तसे तसे सगळे तिला जपू लागले.. बोलता बोलता सहज बोलुन गेले आमच्या घराण्याचा वंश आहे हा... जणू काही मुलगाच होणाऱ अशी तयारी सुरू होती, तिच्या मनात अनामिक भीती निर्मांण झाली, झोपायची नाही ती अन् शेवटी ही भीती खरी ठरली मुलगीच झाली...
तसे त्या सर्वांनी राक्षसरूप धारण केले, ह्या इवल्याश्या मुलीच्या जीवावर उठले. आपल्या जावयांनी तर ह्या चिमुरडीचा गळा दाबायचा प्रयत्न केला. तेव्हा मात्र आपली माला पेटून उठली अगदी राणी लक्ष्मीबाई सारखी अन त्या मुलीला उराशी घेऊन सिद्ध झाली सर्वांशी लढायला... शेवटी एक आईच असते जी स्वतःवरचा अन्याय सहन करू शकते पण आपल्या लेकराला काही झाले तर मात्र ती बंड पुकारते.
ह्या चिमणीला वाचवताना मिळेल ती वस्तू तिने त्यांना फेकून मारली. तिलाही कळले नाही आपण काय करतोय? घाबरून तिने घर सोडले आणि इथे आली. काय चुकले हो सांगा मला?
मी तर म्हणते योग्य वेळेस तिने ही चाकोरी तोडली. मी आहे तिच्या पाठीशी खंबीर उभी. काहीही झाले तरी मी आता तिला असल्या नरकात ढकलणार नाही.
ज्या समाजात अजूनही स्त्रीला अशी वागणूक दिली जाते, घरच्या लक्ष्मीला वेड ठरवले जाते. पहिली बेटी धनाची पेटी असे म्हटलं जाते पण इथे तर त्या चिमुरड्या जिवाचा बळी घ्यायचा प्रयत्न केला त्यांनी. स्वतः मात्र माणुसकीची चाकोरी पण सोडून वागले आणि माझ्या मुली कडून चाकोरीबद्ध वागण्याची अपेक्षा करतात हि लोकं... अशा लोकांना शिक्षा व्हायलाच हवी.
विजयरावांचे डोळे उघडले, त्यांनी लगेच खोलीत जाऊन मालाची भेट घेतली. पोरी मला माफ कर.. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आपण काय वाटेल ते करू चाकोरीबाहेर जायला लागल तरी चालेल पण तुला न्याय मिळवून दिल्या शिवाय हा बाप गप्प बसणार नाही.
माला आज आपल्या वडीलांच्या खांद्यावर डोक ठेवून खुप रडली. मोकळी झाली.
दुसऱ्या दिवशी जावई आले, परत एकदा वाटेल तें आरोप केले. पण आज विजयराव खंबीर होते त्यांनी जावयाला चार खडे बोल तर सुनावले, "कन्यारत्नाची लक्ष्मी म्हणून पूजा केली जाते ज्या घरी.... सुखाची भरभराट होऊन समाधान आणि शांती नांदते तेथे खरी...." हे तुम्हाला कधी समजणारच नाही. माझ्या मुलीला वेड ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कॊणी दिला?
तुम्ही साधी माणुसकी दाखवली नाही आणि तिच्याकडून त्याला विरोध झाला म्हणून तिला वेडं ठरवलं तुम्ही..
आता कोणतीही चाकोरी या बापाला आपल्या मुलीला न्याय मिळवून देताना अडवू शकत नाही.
तिच्या वडीलांनी सर्व चाकोर्या जुमानून मालाला न्याय मिळवून दिला. आणि माला उजळ माथ्याने समाजात फिरु लागली. तिच्या सासरच्या लोकांना योग्य ती शिक्षा शासनाने दिली.
अजूनही या समाजात अशा अनेक गोष्टी घडत असतात, मुलगी झाली म्हणून दुःख करत बसणारे, तर काही गर्भातच तिला नष्ट करणारे, आई त्याला विरोध करते, पण तिला गप्प केले जाते. अशा वेळेस तिला गरज असते ती आधाराची, पाठींब्याची तो आपण द्यायला हवा. मुलीचा संसार, समाज या चाकोरीत न अडकता अन्यायाविरूद्ध आवाज उठवायला हवा हेच मला या कथेतून सांगायचं आहे. कथा पूर्ण काल्पनिक आहे.
कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा. अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून.. अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.... साहित्य चोरी हा गुन्हा आहे. सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी. कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.