वेदना सुखावली,हासली तुझ्यासवे
वेदना सुखावली,हासली तुझ्यासवे
अतिशय बिकट परिस्तिथी होती मेघाची.खूपच नाजूक,दोन जुळी मुले जन्मत:च गेली.डॉक्टर म्हणाले परत आई होता येणार नाही. जीवाला धोका आहे हे ऐकताच पुरती कोसळली. मनी अतिशय दूःख.नाजूक अवस्था.सुटलेल्या पान्हामुळे ओले होणारे कपडे पदराआड लपवत होती.पण,डोळ्यात येणारे पाणी कसे लपवणार? ह्या मनाला झालेल्या वेदनेतून हळू हळू सावरत होती.
दोन महिन्यात जाऊ आली बाळंतीण होऊन.मेघा आपले दुःख विसरून मोठ्या मनाने बाळाला बघायला गेली.पण मेघाला बघताच जाऊ बाईने, नजर लागू नये म्हणून आपल्या मुलाला पदराआड लपवून ठेवले अन् म्हणाली झोपलाय तो.मी नंतर तुम्हाला बोलवते बाळ उठले की.तिच्या नजरेतले भाव अन् चेहरा मात्र बरच काही बोलून गेला.पदराचा असाही उपयोग करतात हा विचार करून तिला खूप वाईट वाटले, डोळ्यात आलेले पाणी सावरत तिथून बाहेर आली. अन् मग् मात्र तिचा बांध सुटला.खूप रडली,मोकळी झाली. मनातले सर्व वेदना, दुःख सारं काही जणू त्या आसवाच्या डोहात वाहून गेले.त्यानंतर मनाशी कसला तरी निश्चय केला.
सागरला बघितल्यावर तिला अजून भरून आले, त्याला मिठी मारून परत एकदा जोर जोरात रडून तिने आपल्या दुःखाला, मनाला होणाऱ्या वेदनांना तिने वाट मोकळी करून दिली.तिची अवस्था बघून सागरला फार वाईट वाटत होते.तो सुद्धा आतून तुटला होता, पण फक्त तिच्या साठी तो खंबीरपणे उभा राहून सावरायचा प्रयत्न करत होता.आज झालेला सर्व प्रकार तिने सागरला सांगितला त्याच बरोबर एक निर्णय सुद्धा सांगितला.
सागर, मी आज जे तूला सांगितलं ह्या अशा घटना आता आपल्या या घरात वारंवार होत राहणार, म्हणूनच आपण स्वतंत्र राहावे असे मला वाटते.जाऊ बाईंना लहान बाळ आहे त्यामुळे त्यांना आई, बाबा अशा मोठ्या माणसांची गरज आहे.मला कोणा बद्दल मनात अढी ठेवायची नाही.त्यांच्या जागी मी असते तर एक आई म्हणून मी अशी वागले असते की माणूस म्हणून चांगले हे मला सांगता येणार नाही. पण म्हणून त्यांना वाईट ठरवण्याचा हक्क मला नाही. त्यापेक्षा, आपणच बाजूला होऊ आणि लहान मुलांसाठी म्हणजे ज्यांचे आई वडील नाहीत अशा अनाथ मुलांना मायेचा पदर, पाठीवर आधाराचा हात द्यावा असे वाट्ते मला.हे सर्व ऐकल्यावर सागरला खरच तिचे खूप कौतुक वाटले.
त्या दोघांनी वेगळा संसार मांडला.अन् जवळच असलेल्या अनाथ आश्रमात ती जाऊ लागली. तिथल्या लहान मुलांमध्ये ती रमून गेली.तिच्या मनाच्या त्या वेदना इथल्या या लहान मुलांच्या निरागस हास्याने अगदी सुखावून गेल्या.तिने ह्या कार्यात स्वतःला खूप वाहून घेतले, काही कालांतराने तिने तो आश्रम चालवायला घेतला. आता तीच्या मायेच्या पदराखाली असंख्य अनाथ मुले आनंदाने रहात होती. प्रत्येकाचा वाढदिवस, सारे सण ह्या मुलांसोबत ती खूप हौसेने साजरे करायची.
तीच्या चेहऱ्यावर दिसणारा हा आनंद, हे समाधान बघून सागरला खूप छान वाटायचं.आज त्यांच्या लग्नाचा १५ वा वाढदिवस आणि मेघाचा ४०वा वाढदिवस होता. गेल्या १० वर्षात हा आश्रम तीच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला होता म्हणून सागरने त्या आश्रमातच साजरे करण्याच ठरवलं. सर्व जण खूप छान तयारी करत होते, मेघा प्रत्येकाला जीव लावायची त्यामुळे तिच्या साठी काहीतरी करायला मिळणार ह्या आनंदासाठी लहान मोठे सारी मुले काम करत होते.
संध्याकाळी जेव्हा सागर तिला आश्रमात घेऊन आला तेव्हा सर्व तयारी पाहून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.ती सागरला म्हणाली, माझ्या मनाला झालेली ती वेदना तुझीच समजून तू मला साथ दिलीस.आज तुझ्या साथीमुळेच मी माझ्या दुःखावर मात करू शकले.मी आई होऊ शकणार नाही हे डॉक्टरांनी सांगितलं आणि मी खचून गेले पण तू माझी प्रत्येक क्षणी साथ दिलीस, आज एवढ्या मुलांची आई म्हणून मिरवताना मला खूप छान वाटते, तुझ्यामुळेच, तू दिलेल्या पाठींब्यामुळे मी हे करू शकले.
खरच, वेदना सुखावली, अन् हासली तुझ्यासवे.
कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.अभिप्राय द्यायला विसरू नका हं.अर्थात तुमच्या कंमेंटमधून.
अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका.साहित्य चोरी हा गुन्हा आहे.सदर कथेच्या प्रकाशनाचे, वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी. कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.