व्यसन... सुखाचं
व्यसन... सुखाचं
मला आनंदाचं व्यसन लागलं होतं. केवळ त्याच्या साठी आणि त्याच्या मागे मी पळत सुटलो होतो.
काही दिवसांपासून मला खूप उदास रिकामं वाटत होतं.अत्यंत वाईट आणि जहाल विचार मनात येत होते. सगळं झूठ, विषारी, क्लेशदायक भासतं होतं. त्रास वाढत होता.देवाने आता माझ्यासमोर याव मला मार्गदर्शन करावं, अडचणी दूर कराव्या असं वाटतं होतं. मला पडलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरं द्यावी असं वाटलं.
अचानक सुचलं या क्षणी देव खरोखरीच प्रगट झाले आणि मला विचारलं ,"सांग तुझी सगळी दुखः , त्रास मी क्षणात दूर करतो कायमचा पण तुला जगण्यासाठी फक्त सुख पुरेल का?"
दोन क्षण काही सुचेना.खरचं असं झालं तर किती बरं होईल.
पण असं झालं...तर आणि मानवी मनाला कुठलं दुःखचं नसेल तर?
कधी रडण्याचा,कष्टी होण्याचा, घाबरण्याचा, थकण्याचा प्रसंग आलाच नाही तर???
असं चढ उतार नसलेलं जीवन जगायला आवडेल?
अंधार उजेडाची ओळख करून देतो. निराशा ही आशेची शक्ती वाढवते.
सूर्यनारायण आकाशात यावे म्हणून आधी अंधार होणं गरजेचं असतं.
दुःख ही आनंदाची किंमत कळून देतं.
माणूस म्हणून जगायला सुख पुरेसं नाही आणि घडवायला तर नक्कीच नाही. नदी उगमापासून सुंदर असतेच असे नाही जेव्हा ती दऱ्याखोऱ्यात डोंगर कपारीतून वाहते तेव्हा कला कलाने वाढते मगं विशाल आणि व्यापक होत जाते.
जेव्हा दिवसभर उपवास घडतो तेव्हा त्यानंतरचा पहिला घास अम्॒ता प्रमाणे वाटतो. ते सुख उपाशी राहील्या नंतर मिळतं.
सुख म्हणजे तरी नक्की काय? आपल्या मनाप्रमाणे होणाऱ्या गोष्टीच ना! मनाविरुद्ध किंवा आपल्या मताने न चालणारं जीवनाचं चक्र दुःख ह्या व्याख्येचं मूळ आहे.तिथे ही आपला आपला स्वार्थ येतोच. न समजणारं दुःख खूप मोठं असतं हे ही तितकंच खरं.
माझी अशी दुःखाची गरज म्हणून असली तरी त्यामागे येणाऱ्या सुखाचा शोध जास्त ओढा वाढवितो.थोडक्यात काय तर ज्याने सुख म्हणजे काय हे समजवायला मदत केली त्यांच्याकडून मला दुःख ही समजून घेतलं पाहिजे.
पारड्यात दानं दोन्ही बाजूला सम प्रमाणात असू दे जेणेकरून मला माणूस म्हणून जगायला आवडेल. फक्त एक प्रार्थना करतो.
दुष्काळात जसा पाऊस होऊन आनंद देतोस तसा महापूरात उजेड होऊन उब देत रहा.ताकद जी दिसतं नाही अशी सोबत कायम कर.