सुनबाई जरा जपुन
सुनबाई जरा जपुन
आम्ही नॉन व्हेजिटेरियन असल्यामुळे आमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार हा शाकाहारी पेक्षा मांसाहारी पदार्थांनी जास्तच केला जातो.
आमच्याकडे गावी कुकूटपालन असल्यामुळे आम्ही घरच्याच कोंबड्यांचे चिकन करण्याचे नियोजन केले होते.ज्या दिवशी नॉनव्हेज करायचे ठरले तो होता मंगळवारचा दिवस आमच्याकडे मंगळवारी हमखास नॉनवेजचा बेत असतोच.
पण त्यादिवशी माझ्या मिस्टरांचे मामा (आत्याचे मिस्टर) जेवायला येणार होते.नॉनव्हेज म्हटलं की, आदल्या दिवशीपासून तयारी सुरू होते.शेतातील नारळाच्या झाडाचे ओले नारळ काढून ते फोडावे लागतात.त्याचे दूध निघेपर्यंत तो बारीक करावा लागतो.त्यानंतर सगळ्या पेस्ट अद्रक लसूण, कांद्याची पेस्ट, कोथिंबीर बारीक करून फ्रिजमध्ये ठेवावी लागते.मगच दुसऱ्या दिवशी कमी वेळात नॉनव्हेज तयार होते. त्यामुळे आम्ही ही सगळी तयारी करुन घेतली.
दुसऱ्या दिवशी घरात व्हेजिटेरियन असणाऱ्या सगळ्यांचा स्वयंपाक करून घेतला आणि तो झाल्यानंतर आम्ही पोळ्या,भाकरी करून घेतल्या. आमच्याकडे जसे व्हेजिटेरियन मध्ये मोकळी भाजी केली जाते; तसेच नॉनव्हेजच्या भाजी मध्ये फ्राय केला जातो. नेहमीप्रमाणे व्यवस्थित मसाले वगैरे घालून आम्ही फ्राय बनवला. त्यानंतर आमटी बनविण्यासाठी आम्ही तयारी सुरू केली. मिरची अगदी झणझणीत होती.आमटी मी करायची ठरवलं. आमटी तयार झाली पाहुणे आले.
हात- पाय वगैरे धुतल्यानंतर चहा पाण्याचा कार्यक्रम झाला.लगेच आम्ही ताट वाढायला घेतले. कांदा कापला, लिंबाच्या फोडी केल्या त्या ताटात वाढल्या..फ्राय वाढला, पोळी वाढली, भात वाढला.मीठही ताटाला वाढल. त्यानंतर आमटी वाढली. घरातल्या आणखी काही मंडळींसोबत पाहुणे जेवायला बसले.जेवायला बसल्यावर समजले अरे बापरे! आमटी तिखट झाली.मी विचार केला कशामुळे तिखट झाली. मी तिखट टाकले नसेल, म्हणून सासूबाईंनी एक वाटी काढून दिले. मला वाटले एवढे लागत असेल, मग मीही ते सगळे टाकले आणि फार फजिती झाली.
पाहुण्यांना मग तरी किंवा कट द्यायचा बेत कॅन्सल केला. नेहमीप्रमाणे नॉनव्हेज बनवणारी मी पाहुणे येणार या विचाराने गोंधळले की काय..? असं मला वाटायला लागलं.पण पाहुण्यांनी समजून घेतलं. बाकी सगळं एकदम छान झालं होत फ्राय वगैरे.. त्यामुळे आता आवर्जून कोणतेही पाहुणे आले की, तिखट टाकताना विचार करतो तीन वेळा.. सासुबाई ही माझ्याकडं तिखट टाकताना हमखास येऊन पाहतात जशा काही त्यांच्या नजरेत सुनबाई जरा जपुन. ह्याच सूचना असतात .
मग मीही जरा जपुनच एवढेच तिखट लागणार आहे का ? याची खात्री करून घेते आणि मगच भाजी बनवते कारण "अतिथी देवो भव:"अथितिला त्रास होऊ नये आणि आपण केलेले जेवण त्यांना आवडले पाहिजे यासाठीच तर असतो अट्टाहास.