बकेट लिस्ट
बकेट लिस्ट
पावसाचा अंदाज ज्याचा त्याचा न्यारा, कोणाचा मनमोर फुलावी पिसारा, तर कोणाकडे आठवणींचा पसारा, कोणी त्याच्या रंग-गंधात धुंद तर कोणी मनमुराद भिजण्यात दंग…
शेतकऱ्याची पावसाकडे भरपूर पिकासाठी प्रार्थना तर बच्चे कंपनीला शाळेला सुट्टी आणि पावसात खेळण्यासाठी धिंगाणा, दोन प्रेमी युगुलाला प्रेमाची पर्वणी अशी असते ऋतू चक्राची करणी. बरसत राहतो तो असा धुंद होते धरणी…
मात्र एखाद्याच्या “बकेट लिस्ट” मध्ये कधी दुनियेच्या मनातही येणार नाही अशी काही इच्छा असते आणि ती पूर्ण करण्याची जिद्द सुद्धा असतेच. काहीसे असेच झाले मयुरी आणि अभिजीतच्या बाबतीत. मयुरी पावसाला घाबरायची. त्यात डुंबायला भिजायला नाही म्हणायची मात्र अभिजीतला पाऊस आणि ती दोघेही आवडायचे. कधीही पाऊस आला की ह्याची पावसात बाहेर छत्रीविना फिरणे, भजी खाणे, छोट्या मुलांना होड्या बनवून देणे, ज्यांची मुले परदेशात आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना किराणा सामान, औषधे आणून देणे अशी कामे करणे आणि ते ही स्वतः छान पावसात आनंद घेत. मयुरी त्याच्या काळजीपोटी त्याला लाडे-लाडे रागवायची. “काळजी घे” असे दहा वेळा फोन करायची मात्र जेंव्हा जेंव्हा तो तिला पावसात जावू फिरायला असे म्हणायचा, ती काही तरी कारण काढून टाळायची.
तिच्या मनात भीतीचा पाऊस आणि ह्याला पावसात हिरवे गर्द व्हायची हौस. त्याने ठरवले असते तर तो एकटा सुद्धा आपली हौस पूर्ण करू शकला असता पण त्याचे तिच्यावर, पावसावर आणि “रीम झिम गिरे सावन” ह्या गण्यावरही तितकेच प्रेम होते. एकदा त्याचा मित्र दिलीप त्याच्याकडे आला होता. तेंव्हा त्याने दिलीपला मयुरीसमोर आपली मनातली इच्छा बोलून दाखवली. दिलीपही जराही विचार न करता अभिजीतची ही इच्छा पूर्ण करणे कामी सर्व तयारी करण्यास लगेच तयार झाला.
इच्छा अजिबात साधी सुधी नव्हती. मरीन ड्राइव्हवर जावून ज्या ठिकाणी श्री. अभिताब बच्चन आणि मौसमी चॅटर्जी यांचे “रिम झिम् गीरे सावन” हे गाणे चित्रित केले गेले तिथे जावून तशाच पावसात तेच गाणे मयुरी आणि अभिजीत यांच्यावर चित्रित होणार आणि त्या गाण्यावर अभिजीत आजही त्याचे मयुरी वर असलेले प्रेम पुन्हा व्यक्त करणार. तसाच सगळा योग जुळून येणे हे तर फार मोठे शिवधनुष्य पेलाण्यासारखे होते.
मात्र दिलीपनेही नीट नोट्स काढून तयारी केली. जुलै महिन्याच्या शेवटच्या चार दिवसात पाऊस येणार असा हवामान खात्याचा अंदाज होता. त्याप्रमाणे सर्व सज्ज झाले. हॉटेल बुक केले. हॉटेलमध्ये जाऊन प्रतिक्षा होती ती त्या गाण्यात जसा पाऊस पडतो तसा बरसण्याची.
एक दिवस तसाच गेला. मुंबईच्या हॉटेलचे बिल, शूटिंगची पूर्ण टीम त्यावर होणारा खर्च आणि पाऊस आलाच नाही. दिलीपला आता काळजी वाटायला लागली. वाटले की आपण आपल्या मित्राची बकेट लिस्ट मधील ही इच्छा पूर्ण करू शकू की नाही. पण असे म्हणतात की मनापासून केलेल्या प्रेमासाठी बरसात सुद्धा झाली मरीन ड्राईव्ह काठी.
सगळी टीम पूर्ण तयारीने काम करत होती. मयुरी ही पावसाबरोबर पतीचे असलेले अनोखे नाते आणि त्याच्यावरचं प्रेम यात धुंद होवून नवीन अनुभव घेत होती. नवीन गाण्याचा जगण्याचा आविष्कार तयार होत होता आणि अभिजीतची “बकेट लिस्ट” ही पूर्ण झाली होती.